जीवन कसे जगावे हे पुस्तके शिकवतात – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

0
9

सांगली, दि. 29 : जीवन कसे जगावे हे पुस्तके शिकवतात. पुस्तकाची, वाचनाची आवड जोपासल्यास निश्चित यश मिळते. असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात आयोजित केलेल्या ग्रंथोत्सवाच्या उद्घाटप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. हे प्रदर्शन उद्या दि. २९ पर्यंत असेल.

यावेळी ज्येष्ठ साहित्यक प्रा. वैजनाथ महाजन, शांतीनिकेतनचे संचालक गौतम पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आ. मु. गलांडे, प्रशांत खाडे, जिल्हा  माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, एकनाथ जाधव, पांडूरंग सुर्यवंशी, विष्णू तुळपुळे, संतोष शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी या ग्रंथदिंडी सोहळ्याचा शुभारंभ महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्या हस्ते झाला.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले की, आजच्या काळात वाचनाचे प्रमाण तुलनेने कमी झाले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी असे ग्रंथोत्सव उपयुक्त ठरतील. ग्रंथोत्सवात अनेक लेखक, विचारवंतांचे साहित्य वाचकांसाठी उपलब्ध झाले आहे. वाचेल तो वाचेल असे म्हटले जाते. संकटे, चिंता प्रत्येकाच्याच आयुष्यात असतात. आशावेळी अनेकजन हतबल होतात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर, स्वामी विवेकानंद यांना समोर ठेवावे, दु:खला सामोरे जाण्याची क्षमता आपल्या येईल. असे सांगून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मी लोकप्रतिनिधी होऊ शकलो ते जन्माला आले नसते तर आज मी येथे नसतो. घटनेनं दिलेल्या अधिकारामुळेच सामान्यातला सामान्य, गरिबातील गरीब माणूस सरपंचापासून राष्ट्रपती पदापर्यंत पोहचू शकतो. ही ताकद डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाची आहे.

ग्रंथ आपल्या दारी हा उपक्रम स्तुत्य असून पुस्तक हा आपला साथी बनवा, एकाकीपण कधीच येणार नाही. वृध्दपकाळही सुखाचा होईल. वाचन आणि संगीताची आवड तुम्हाला जीवनभर आनंदी ठेवेल. जीवन कसे असावे हे पुस्तके शिकवतात. पालकमंत्री डॉ. खाडे यांनी कामगार कल्याण विभागाच्या वतीने मिरज येथे घेण्यात येणाऱ्या साहित्य संमेलनाचाही लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी ग्रंथोत्सवासाठी शांतिनिकेतन या संस्थेने केलेल्या सहकार्याचेही कौतुक केले. विठ्ठल मोहिते यांनी सूत्रसंचालन केले. कन्या विद्यालयाच्या मुलींची स्वागत गीत सादर केले.

रविवार दि. २९ रोजी सकाळी १०:३० वाजता शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सभागृहात ग्रंथालय सेवा व ई-ग्रंथालय याविषयावर जेष्ठ  ग्रंथपाल डॉ. एस. ए. एन. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून या परिसंवादामध्ये प्रा. डॉ. सौ. अपर्णा कुलकर्णी, प्रा. डॉ. अमित सत्तीकर व विजय बक्षी आदी सहभागी होतील. दुपारी २.३० वा. शांतिनिकेतन लोकविद्यापीठ सभागृहात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व ग्रंथोत्सव कार्यक्रमागील उद्देश याविषयावर महानगरपालिका उपायुक्त राहुल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून यात आय.आर.एस. अजिंक्य काटकर, पोलिस उपधिक्षक अजित टिके, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल व परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी अजय शिंदे आदी सहभागी होतील.

दरम्यान ग्रंथोत्सवात सकाळी ९ ते सायं. ७ या वेळेत ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल लावण्यात आले आहेत.