एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही – कृषी मंत्री

0
16

नंदुरबार, दि. २२  : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यातील नंदुरबारसह ४ ते ५ जिल्ह्यांत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. एकही नुसानग्रस्त शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही, तसेच येत्या दोन दिवसात युद्धपातळीवर पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना पिकनिहाय योग्य भरपाईची घोषणा अधिवेशन काळातच दोन्ही सभागृहात केली जाईल, असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज येथे शेतकऱ्यांना दिला.

नंदुरबार तालुक्यातील गारपीटग्रस्त व अवकाळीग्रस्त आष्टे व ठाणेपाडा भागातील नुसानग्रस्त शेतांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देताना कृषीमंत्री श्री. सत्तार बोलत होते. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲड. राम रघुवंशी जि.प.सदस्य देवमन पवार,प.स.सदस्य कमलेश महाले, संतोष साबळे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, तालुका कृषी अधिकारी, निवासी नायब तहसीलदार बी.ओ.बोरसे.,मंडळ अधिकारी, तलाठी व शेतकरी निलेश भागेश्वर, स्वप्निल शेळके आदी शेतकरी व अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

कृषिमंत्री श्री. सत्तार म्हणाले की, कांदा, गहू, बाजरी,पपई, कलिंगडासह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कुठल्याही परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत मिळाली पाहिजे ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे. त्यासाठी अधिवेशन काळातच नुकसानीचा आढावा घेवून पिकनिहाय समाधानकारक भरपाई देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

सहा महिन्यात १२ हजार कोटींची सर्वाधिक मदत

गेल्या सहा महिन्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सुमारे १२ हजार कोटींची मदत शासनाने केली आहे. आत्तापर्यंतच्या कुठल्याही सरकारने एवढी मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केलेली नाही. यावेळीही शेतकऱ्यांना मदत करताना शासन एनडीआरएफ च्या निकषापेक्षा अधिक दराने मदत करू इच्छिते, असेही यावेळी कृषीमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

एक लाख ३९ हजार हेक्टरवर नुकसानीचा अंदाज

यावेळीच्या गारपीट व अवकाळी पावसामुळे सुरूवातीला १३ हजार हेक्टर, नंतर ४० हजार हेक्टर व आत्ताच्या क्षणाला सुमारे १ लाख ३९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज असल्याचेही यावेळी कृषिमंत्र्यांनी सांगितले.

आंदोलनात असूनही कर्मचाऱ्यांनी केले पंचनामे

धुळे,नंदुरबार जिल्ह्यात शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाच्या आंदोलन काळातही शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले असल्याची सकारात्मक बाब खुद्द शेतकऱ्यांनीच आपल्याला सांगितली असून शेतकऱ्यांप्रती सर्वांच्या भावना संवेदनशील असल्याचे सांगत कर्मचाऱ्यांचे कौतुकही यावेळी कृषिमंत्र्यांनी केले.

दोन दिवसात अधिवेशनात भरपाईची घोषणा करणार

महसूल व कृषी विभागामार्फत तात्काळ पंचनामे करण्याबाबत नंदूरबारचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी यापूर्वीच प्रशासनाला आदेश दिले असून पंचनामे झाल्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पिकनिहाय नुकसानीचा आढावा घेवून शेतकऱ्यांना विधानपरिषद व विधानसभेत त्याबातच्या नुकसान भरपाईची घोषणा करणार आहेत, असेही कृषिमंत्री श्री. सत्तार यांनी सांगितले.

थेट बांधावर जावून पाहणी

ठाणेपाडा येथे कांदा पिकाची व आष्टे येथे टरबुज, पपई पिकांची बांधावर जाऊन कृषिमंत्र्यांच्या श्री. सत्तार यांनी पाहणी केली.

थोडक्यात महत्त्वाचे

✅ एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही.

✅ महसूल व कृषी विभागामार्फत दोन दिवसात उर्वरित पंचनामे पूर्ण करणार

✅ गेल्या सहा महिन्यात संकटग्रस्त शेतकऱ्यांना सर्वाधिक १२ हजार कोटींची मदत

✅ पिकनिहाय मदत अधिवेशन काळात विधान परिषद, विधानसभेत घोषित करणार

✅ एन.डी. आर. एफ. च्या तुलनेत जास्त मदत करण्याचा शासनाचा प्रयत्न

✅ एक लाख ३९ हजारावर नुकसान झाल्याचा अंदाज

✅ राज्यात ज्या पाच जिल्ह्यात सर्वात जास्त नुकसान त्यात नंदुरबार,नाशिक, धुळे आणि जळगावच्या काही भागांचा समावेश

✅ कांदा, गहू,बाजरी,पपई, कलिंगडासह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

✅ संपात सहभागी असूनही कर्मचाऱ्यांनी पंचनामे केल्याचे खुद्द संकटग्रस्त शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांना सांगितले