प्रभावी उपचारांद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार –सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

0
24
· ‘एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे’ अभियानाचा भव्य शुभारंभ
मुंबई, दि. ८ : थॅलेसेमियासारख्या गंभीर अनुवंशिक रक्तविकाराविषयी जनजागृती निर्माण करण्याचा व्यापक प्रयत्न करण्यात येत असून प्रभावी उपचारपद्धतींद्वारे थॅलेसेमिया मुक्तीचा निर्धार करण्यात येत असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
८ मे आंतरराष्ट्रीय थॅलेसेमिया दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागामार्फत “एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे” या महत्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर व राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे – बोर्डीकर यांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमाला आरोग्य सेवा आयुक्त तथा संचालक आरोग्य अभियान श्री. रंगा नायक, संचालक आरोग्य सेवा डॉ. नितीन अबांडेकर, संचालक (शहरी) आरोग्य सेवा डॉ. स्वप्नील लाळे, अतिरिक्त संचालक डॉ. विजय बाविस्कर, सहसंचालक श्री. तुळशीदास सोळंके, डॉ. सुनीता गोल्हाईत, डॉ. गोविंद चौधरी, डॉ. सरिता हजारे, सहाय्यक संचालक डॉ. महेंद्र केंद्रे (राज्य रक्त कक्ष), तसेच थॅलेसेमिया ग्रुप परभणीचे डॉ. लक्ष्मीकांत पिंपळगावकर उपस्थित होते.
सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, थॅलेसेमिया रुग्णांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविण्याकरिता आणि त्यांच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी शासन विविध पातळ्यांवर प्रयत्नशील आहे. यामध्ये नियमित रक्त संक्रमण, बोन मॅरो ट्रान्सप्लांटसारख्या उपचारपद्धती उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यासोबतच मोफत आरोग्य सल्ला व मार्गदर्शन केंद्रांची उभारणी देखील करण्यात आली असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.
सकारात्मक परिणाम घडविणारा उपक्रम –सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर
शासनाचा हा उपक्रम केवळ एक कार्यक्रम न राहता, तो समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणारा एक मोठा पाऊल ठरेल असा विश्वास सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी व्यक्त केला. जनतेच्या सक्रिय सहभागाशिवाय ही लढाई जिंकता येणार नाही, हे स्पष्ट करत सर्व नागरिकांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे – बोर्डीकर म्हणाल्या, थॅलेसेमिया आजारावरील उपचारपद्धती आता प्रगत झाली असून यांसदर्भात अधिक जनजागृती करण्यात यावी.
या उपक्रमांतर्गत थॅलेसेमिया टाळण्यासाठी विवाहपूर्व चाचण्यांचे महत्व अधोरेखित करण्यात आले. “थोडीशी काळजी, पुढच्या पिढीचं आयुष्य वाचवू शकते” या घोषवाक्याद्वारे उद्देशून जागरूकतेचा संदेश देण्यात आला. “जीवन सक्षम बनवा, प्रगतीला स्वीकारा” या अभियानाच्या मुख्य सूत्रातुन आरोग्यदृष्टीने सक्षम व थॅलेसेमिया-मुक्त महाराष्ट्राचा संकल्प अधोरेखित करण्यात आला आहे.
यावेळी थॅलेसेमिया रुग्णांना दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. www.thalesemiyasupport.com या वेबसाईटचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.मोफत आरोग्य सल्ल्यासाठी १०४ क्रमांक उपलब्ध असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.