
नवी दिल्ली, 15: छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरीत्र अतिशय प्रेरणादायी असून कितीही संकटे आली तरी हार मानायची नाही असा बोध मिळतो, असे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या 368 व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात केले.
महाराष्ट्र सदन येथे सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन, छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय जयंती व सांस्कृतिक महोत्सव दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी सांयकाळी छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली, यावेळी श्री जाधव बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन केंद्रीय राज्य मंत्री श्री जाधव, जिजाऊ यांच्या माहेरचे वंशज शिवाजी जाधवराव, आचार्य श्रीजामोदेकर बाबा, सुदर्शन न्युज चॅनेलचे संचालक डॉ. सुरेश चव्हाण के, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर, गायक व संगीतकार डॉ. राजेश सरकटे, शिव व्याख्याते प्रा. रविंद्र बनसोड यांच्यासह संघटेने मान्यवर मंचावर उपस्थित होते.
श्री जाधव पुढे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांना फार थोडे आयुष्य लाभले मात्र, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा चालवीलाच नाही तर तो वाढविण्याचा प्रयत्नही केला. संभाजी महाराज यांच्याच प्रेरणे पुढील काळात मराठयांनी दिल्लीचे तख्त राखलेच नाहीतर ते चालविले सुद्धा, असे ही जाधव यावेळी म्हणाले.
छत्रपती संभाजी महाराज यांचे अष्टपैलू असे व्यक्तीमत्व होते. ते जितके मोठे योध्दा होते, तितकेच त्यांना साहित्यातही रस होता. भाषाप्रेमीही होते. त्यांच्या या गुणांचे अनुसरन सर्वांनी केल्यास त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे श्री जाधव म्हणाले.
महाराष्ट्र सदनात सायंकाळी हितेश पटोळे यांनी तयार केलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळाचे पूजन व अभिवादन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमातही छत्रपती संभाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळयाचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करण्यात आले. यावेळी सामाजिक क्षेत्रात विशेष काम करणाऱ्या मान्यवरांचा स्मृती चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
प्रा. राजेश सरकटे यांचा ‘गर्जा महाराष्ट्र’ हा सांस्कृतिक कार्यक्रम रंगला, ज्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. प्रा. डॉ. प्रभाकर जाधव यांच्या ‘मराठा दुरिझम’ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. व्याख्याते प्रा. रवींद्र बनसोड यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर ओजस्वी व्याख्यान दिले.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन जयंती महोत्सव अध्यक्ष व छावा भारत क्रांती मिशनचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. विलास पांगारकर, छावाचे संस्थापक अध्यक्ष किशोर चव्हाण, भारत क्रांती मिशनचे मुख्य समन्वयक विजय काकडे पाटील, सरचिटणीस परमेश्वर नलावडे, स्वागत अध्यक्ष इंजि. तानाजी हुस्सेकर, प्रा. श्री. राजेश सरकटे, विनोद सरकटे, अक्षय ताठे, सतीष जगताप आणि अमोल टकले यांनी केले. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा ऐतिहासिक सोहळा यशस्वी झाला.