
धाराशिव -शहरात बिनधास्त आणि बेदरकारपणे कर्णकर्कश आवाज काढत नागरिकांच्या शांततेचा भंग करणाऱ्या बुलेटस्वारांवर अखेर वाहतूक शाखेने धडक कारवाईचा बडगा उगारला आहे. शहराच्या विविध भागांमध्ये रात्री अपरात्री दणदणाट करणाऱ्या, मॉडिफाय सायलेन्सर लावणाऱ्या ‘बुलेटबाजां’वर पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत, बार्शी नाका परिसरात मोठी कारवाई केली आहे.
१८ जून संध्याकाळी वाहतूक शाखेच्या पथकाने बार्शी नाका परिसरात कानठळ्या बसवणाऱ्या बुलेटस्वारांना पकडले. यावेळी तब्बल १५ ते २० बुलेटस्वारांवर कारवाई करण्यात आली. सर्व वाहनधारकांना कडून दंड वसूल करण्यात आला असून, मॉडिफाय सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत.
वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक यांच्या आदेशावरून ही मोहीम राबविण्यात आली असून, शहरातील नागरिकांच्या अनेक तक्रारीनंतर पोलिसांनी ही धडक पावले उचलली आहेत. बुलेटला लावले जाणारे आवाजवाढ सायलेन्सर नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक ठरत असून, लहान मुले, वृद्ध आणि विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता.
वाहतूक विभागाकडून वारंवार सूचना देऊनही काही मंडळी मुद्दामहून आवाज करणारे सायलेन्सर बसवत शहरात “धिंगाणा” घालतात. त्यांच्यावर आता कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा कडक इशारा वाहतूक विभागाने दिला आहे.धाराशिव शहरातील वरदळीच्या ठिकाणी अशीच कारवाई सुरू राहणार असून, मॉडिफाय बुलेटधारकांसाठी ही स्पष्ट चेतावणी आहे की, “आता नियम तोडले, की थेट कारवाई होणार!”
वाहतूक शाखेच्या वतीने यापुढे शहरातील प्रत्येक रस्त्यावर तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. नियम न पाळणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई, वाहन जप्ती आणि परवाना निलंबनाची प्रक्रिया देखील सुरू करण्यात येणार आहे.