
कोलकाता-भारतीय जनता पक्षात नाराज असलेले राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी अखेर तृणमूल काँग्रेसमध्ये सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. आपला मुलगा आमदार शुभ्रांशू रॉय आणि समर्थकांसह त्यांनी घरवापसी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते भाजपवर नाराज होते. या दरम्यान, त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी संपर्क पुन्हा वाढवला. भाजपच्या कित्येक बैठकांमध्ये गैरहजर असताना त्यांनी पत्नी आजारी असल्याचे कारण दिले होते.
भाजपवर नाराज असताना त्यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरून संवाद साधला होता. दोघांमध्ये झालेल्या 10 मिनिटांच्या संभाषणात मोदींनी रॉय यांच्या पत्नीच्या आजारपणाची विचारणा सुद्धा केली. पण, मोदींशी चर्चा झाल्याच्या ठीक 7 दिवसांनंतर मुकुल रॉय यांनी पुन्हा ममतांच्या पक्षात जाणार असल्याचा निर्णय घेतला.
हे आहे भाजप सोडण्याचे कारण
तृणमूल काँग्रेस पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले, की जो मान सन्मान मिळण्याच्या अपेक्षेने मुकुल रॉय भाजपमध्ये गेले होते, तो त्यांना मिळाला नाही. त्यामुळेच ते तृणमूल काँग्रेसमध्ये परत येत आहेत. शुभेंदू अधिकारी यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण, शुभेंदूंना जसा मान-सन्मान भाजपमध्ये मिळाला. तसे मुकुल रॉय यांना मिळालेले नाही. एकेकाळी भाजपमध्ये नंबर 2 चे नेते राहिलेले मुकुल रॉय यामुळेच चिंतीत होते.
हे नेते सुद्धा ममतांच्या पक्षात जाण्यासाठी आतुर
भारतीय जनता पक्षात गेलेले आणि तृणमूल काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक असलेल्या नेत्यांमध्ये मुकुल रॉय एकटे नाहीत. त्यांच्यासमवेत भाजपचे आणखी 33 खासदार पुन्हा तृणणूल काँग्रेसमध्ये सामिल होण्यासाठी आतुर आहेत. या नेत्यांमध्ये राजीव बॅनर्जी, सोवन चॅटर्जी, सरला मुर्मू, माजी आमदार सोनाली गुहा आणि दीपेंदू विश्वास यांचा समावेश आहे. पण, ममता बॅनर्जी त्यांना पुन्हा आपल्या पक्षात घेण्यास तयार नाहीत. त्यांना पक्षात घेतल्यास प्रामाणिक सदस्यांमध्ये असंतोष वाढेल असे ममतांना वाटते. एकदा पक्षाशी दगा केला त्यांना पुन्हा पक्षात घेऊ नये असे तृणमूल काँग्रेसच्या एका गटाचे मत आहे.





