देशात पहिल्यांदाच एकाचवेळी 8 राज्यांच्या राज्यपालांची नेमणूक

0
96

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)– मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराला मोठ्या प्रमाणावर वेग आला आहे. नवीन मंत्र्यांच्या शपथविधी उद्या 7 जुलै रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी एकाचवेळी तब्बल 8 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली आहे. ही देशातील पहिलीच घटना असून यापूर्वी 2018 मध्ये मोदी सरकारच्या काळात 7 राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली होती.

विशेष म्हणजे केद्रीय मंत्री थावरचंद गेहलोत यांना केंद्रीय मंत्री पदावरुन काढून कर्नाटकच्या राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे त्यांच्या जागी जोतिरादित्य सिंधिया यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु, त्यांना कोणते खाते मिळले याबाबत अजून कोणतेही अधिकृत माहिती मिळाली नाही.

कोणाची कुठे बदली झाली? (8 पैकी 4 बदली, 4 नवे राज्यपाल)
1. मंगूभाई छगनभाई पटेल : मध्य प्रदेशाचे राज्यपाल होतील.
2. थावरचंद गेहलोत : केंद्रीय मंत्री होते, आता कर्नाटकचे राज्यपाल होतील.
3. रमेश बॅस : त्रिपुराचे राज्यपाल होते, आता झारखंडचे राज्यपाल होतील.
4. बंडारू दत्तात्रेय : हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते, आता हरियाणाचे राज्यपाल होतील.
5. सत्यदेव नारायण आर्य : हरियाणाचे होते, आता त्रिपुराचे राज्यपाल होतील.
6. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर : हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होतील.
7. पीएएस श्रीधरन पिल्लई : मिझोरमचे राज्यपाल होते, आता गोव्याचे होतील.
8. हरिबाबू कंभंपती : मिझोरमचे राज्यपाल होणार

मंत्रिमंडळ विस्तारात ‘या’ नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता
मोदी सरकारच्या नवीन मंत्रिमंडळात अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार आहे. या मंत्रिमंडळात मध्यप्रदेशातून जोतिरादित्य सिंधिया, आसाममधून सर्बानंद सोनोवाल आणि बिहारमधून माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. पुढील वर्षी विधानसभा निवडणूक असल्याने उत्तर प्रदेशला झुकते माप मिळण्याची शक्यता असून वरुण गांधी, रामशंकर कठेरिया, अनुप्रिया पटेल यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल असे सांगितले जात आहे.