
नागपूर,वादग्रस्त मंत्री संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांनी काल मंजूर केल्यानंतर या पदावर नियुक्तीसाठी हालचाली सुरू झालेल्या आहे. रामटेकचे आ. अॅड. आशीष जयस्वाल हे या पदासाठी उत्सूक असून, शिवसैनिकांनी त्यांच्या नावाचा रेटा पक्षप्रमुखांकडे केलेला असल्याचे सुत्रांनी सांगितले.
रामटेकचे आ. अॅड. आशीष जयस्वाल हे शिवसैनिक आहेत. त्यांनी रामटेकमधून सलग तीनवेळा निवडणूक जिंकली आहे. मोदी लाटेत पराभूत झाल्यानंतरही ते शिवसेनेत राहिले. भाजपने त्यांना रामटेक विधानसभेची ऑफर दिली होती अशी अफवाही जोरात होती. विधानसभेत युती झाल्याने भाजपने सेटिंग-गेंटिगचा फॉर्म्युला वापरून तत्कालीन आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनाच उमेदवारी दिली. त्यामुळे बंडखोरी करून त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. ते अपक्ष म्हणून रामटेक मधून निवडून आले. युतीत शेवटच्या टप्प्यात बिनसल्याने जयस्वाल यांना शिवसेनेचा छुपा पाठिंबासुद्धा होता. निवडून आल्यानंतर जयस्वाल यांनी कुठलीही सौदेबाजी केली नाही. थेट शिवसेनेला पाठिंबा दर्शवला. पहिल्याच मंत्रिमंडळात शिवसेनेच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपद दिले जाईल अशी चर्चा होती. मात्र, त्यांना खनिकर्म विकास महामंडळाचे अध्यक्ष करण्यात आले. भाजप-सेना युतीच्या काळातही ते याच मंडळावर होते. संजय राठोड हे विदर्भातून शिवसेनेचे एकमेव मंत्री होते. आता विदर्भातून शिवसेना मंत्रिमुक्त झाली आहे. वनमंत्री पदासाठी अॅड. आशीष जयस्वाल यांच्यासह संजय रायमूलकर यांच्या नावाची चर्चा आहे. नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या वाट्याला मंत्रीपद आलेले आहे. जिल्ह्यात शिवसेनेचा खासदार आहे. परंतु, जिल्हा परिषद सदस्यांची शिवसेनेची संख्या कमी झालेली आहे. त्यामुळे जिल्ह्यासह विदर्भात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी आशीष जयस्वाल यांना मंत्रिपद देण्यात यावे, अशी शिवसैनिकांची जोरदार मागणी आहे. तसे निवेदन पक्षप्रमुखांकडे पाठविले असल्याचे सुत्रांनी सांगितले.
जयस्वाल यांची बाजू भक्कम
संजय राठोड विदर्भातील होते. त्यामुळे नवा मंत्री नेमताना शिवसेना विदर्भातीलच आमदाराचा विचार करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. विदर्भातील मंत्रिपद द्यायचे झाल्यास शिवसेनेकडे फारसे पर्याय नाहीत. आमदार संजय रायमूलकर आणि भंडार्याचे नरेंद्र भोंडेकर हे शिवसेनेचे आमदार आहेत. भोंडेकर हेसुद्धा अपक्ष निवडून आलेले आहेत. या दोन आमदारांच्या तुलनेत अॅड. जयस्वाल हे वरिष्ठ आहेत. शिवसैनिकांनी अॅड. जयस्वाल यांच्या नावाला अधिक पसंती दिली असल्याचे सुत्रांनी सांगितले.