आगामी निवडणुकीसाठी ओबीसींनी एकत्रित यावे-हेमंत पाटील

0
37

मुंबई, २२ जून –राज्यात गेल्या काही काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला आहे.अशात ओबीसी तसेच राज्यातील उपेक्षित वर्गासाठी लढणाऱ्या संघटना,पक्षांनी एकत्रित येऊन निवडणूक लढवावी, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी रविवारी (ता.२२) केले.

ओबीसी एकजुटीचे आवाहन करीत पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नवा सहभाग, नव्या अपेक्षा व्यक्त केल्या. राज्यातील ओबीसी समाज, तसेच उपेक्षित आणि मागासवर्गीय घटकांनी यंदाच्या स्थानिक निवडणुकांमध्ये आपले नेतृत्व सक्षमपणे उभे करावे.हे आवाहन कुठलाही राजकीय पक्ष किंवा सरकार विरोधात नसून, समाजहितासाठी सकारात्मक भूमिका बजावणाऱ्या नेतृत्वाची गरज ओळखून केले असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

राज्यात ओबीसी समाजाची लोकसंख्या ५० टक्क्यांहून अधिक आहे.परंतु विधानसभेपासून ते स्थानिक स्वराज्य संस्था पातळीपर्यंत त्यांचे राजकीय प्रतिनिधित्व तुलनेने कमी आहे.हे चित्र बदलण्यासाठी विविध समाजघटकांनी संघटित होणे गरजेचे असल्याचे पाटील म्हणाले.विचारधारेवर आधारित, पारदर्शक आणि जनतेच्या प्रश्नांशी बांधिलकी ठेवणाऱ्या नेतृत्वाने पुढे यावे.समाजाने आता फक्त मतदानापुरता नव्हे, तर खंबीर नेतृत्व घडविण्याच्या दिशेनेही विचार करावा,असे आवाहन पाटील यांनी केले.

राज्यातील सध्याची राजकीय परिस्थितीही बदलती आहे.विविध पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यासंदर्भात चाचपणी करीत आहेत. अशावेळी ओबीसी नेतृत्वाने एकत्र येऊन स्वतंत्र आघाडी तयार केली, तर नवीन राजकीय समीकरण तयार होतील.येत्या काळात ओबीसींच्या राजकीय एकीकरणाची दिशा ठरवण्यासाठी हे आवाहन असल्याचे पाटील पाटील म्हणाले.