तैलीक महासंघाचे ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी राज्यात आंदोलन

0
26

– खा. तडस यांची पत्रकार परिषदेत माहिती

वर्धा-महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रद्द केलेल्या ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत देण्यात यावे तसेच ओबीसींची जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने 2 जुलै रोजी महाराष्ट्रभर धरणे आंदोलन व लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती तैलीक महासंघाचे प्रांताध्यक्ष व खा. रामदास तडस यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

खा. तडस पुढे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने 28 मे रोजी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द ठरविल्याचा आदेश दिला आहे. त्या आदेशाने राज्यातील ओबीसींचे 27 टक्के राजकीय आरक्षण रद्द झाले. त्यामुळे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपरिषद व महानगरपालिकांयामध्ये ओबीसी समाजाला जे प्रतिनिधित्व मिळत होते ते राज्य सरकारने कोर्टाला इम्पिरीकल डाटा आजपावेतो सादर केला नाही म्हणून सदर आरक्षण रद्द केले आहे. हा ओबीसी समाजावर अन्याय आहे. देशातील इतर राज्यात ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित असताना राज्य सरकारच्या चुकीमुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण गेले आहे.

त्यामुळे त्याचा निषेध नोंदविण्यासाठी प्रांतिक तैलीक महासभेच्या वतीने ईम्पिरिकल डाटा संकलीत करून सदर डाटा राज्य सरकारने तीन महिन्यात सुप्रीम कोर्टात सादर करावा, न्यायालयाने दिलेला स्थगिती आदेश रद्द करून राज्यात 27 टक्के ओबीसींचे रद्द केलेले राजकीय आरक्षण पुन्हा लागू करावे, राज्य शासनाच्या राज्य निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीसाठी 23 जून रोजी अधिसूचना काढली आहे, परंतु ओबीसीबाबत निर्णय होईपर्यंत स्थगीत करण्यात यावे, राज्य व केंद्रशासनाने मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्या, केंद्र व राज्य शासनाने ओबीसींची जातीनिहाय जनगणना करावी, राज्य व केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणनेनुसार ओबीसी आरक्षणाचा कायदा करावा, राज्य मागास वर्ग आयोगात तेली समाजाला योग्य प्रतिनीधीत्व देण्यात यावी आदी मागण्या करण्यात येणार असल्याचे खा. तडस यांनी सांगितले.
या ओबीसी समाजातील कुणबी, माळी, कुंभार,भोयर/पोवार, वाणी, शिंपी, नाभिक, सोनारसह इतर समाजातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन खा. तडस यांनी केले. यावेळी सुधीर चाफले, जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले, नाना ढगे, प्रदेश कार्यकारणी सदस्य मिलींद भेंडे, डॅा. नरेंद्र मदनकर, चंद्रकांत चामटकर, किशोर गुजरकर, देवा निखाडे, विपीन पिसे, आदी उपस्थित होते.