माझ्यावरील आरोप बिनबुडाचे- खासदार गवळी

0
34

वाशीम-सर्वसामान्य मतदार व शेतकरी यांच्या न्यायहक्कासाठी माझा लढा आहे. माझ्या मतदार संघातील विकासकामे टिकाऊ, दर्जेदार व्हावे यासाठीच माझे प्रयत्न आहेत. मी व माझ्या शिवसैनिकावर होत असलेले आरोप बिनबुडाचे आहेत, असे खा. भावना गवळी यांनी आयोजित पत्रकार परिषदमध्ये बोलतांना प्रतिपादन केले. स्थानिक जनशिक्षण कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. जिल्ह्यातील रस्ता कामासंदर्भात मी व माझ्या शिवसैनिकाबाबत गैरसमज पसरविल्या जात आहेत. महामार्ग रस्ता कामासंदर्भात अनेक शेतकर्‍यांच्या तक्रारीत आहेत. याबाबत शिवसैनिकांनी सुद्धा सबंधित प्रशासनाकडे तक्रारी केल्या.

या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख सुरेश मापारी, तालुकाध्यक्ष रामदास मते, नगरसेवक विनोद खंडेलवाल, रवि भांदुर्गे आदी उपस्थित होते. लोकप्रतिनिधी या नात्याने मी माझे कर्तव्य पार पाडत असून, मी शेतकरी व सामान्य जनतेची प्रतिनिधी आहे. वाशीम जिल्ह्यात होत असलेल्या विकासकामात मी कुठलाही अडथळा आणला नाही. मात्र, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून शिवसैनिक कामात व्यत्यय आणत असल्याचे म्हटले आहे. मी भुखंड माफीयाचे घोटाळे उघड करीत असल्यामुळे भाजपाच्या लोकप्रतिनिधीकडुन माझ्या व शिवसेनेच्या विरुद्ध बदनामीचे षडयंत्र रचल्या जात असल्याचे खा. भावना गवळी यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना स्पष्ट केले.