स्वराज्यध्वजाचे दीक्षाभूमीवर मोठ्या उत्साहात स्वागत

0
27

नागपूर- बहुचर्चित स्वराज्य ध्वज पूजन मोहिमेचे मंगळवार १४ सप्टेंबर रोजी नागपूरच्या विख्यात दीक्षाभूमीवर उत्साहात स्वागत करण्यात आले. गेल्या आठवड्यात गुरूवारी सुरू झालेली हि ध्वज पूजन मोहिम आठ जिल्ह्यांमधून महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची ओळख सांगत नागपूरमध्ये येऊन पोहोचली आहे. आज या प्रवासाचा सहावा दिवस आहे. या दरम्यान शेकडो नागरिकांना या ध्वजाला अभिवादन करण्याची संधी मिळाली आहे. आज सकाळी पवनार येथील विनोबा भावेंच्या परमधाम आश्रमाला स्वराज्य ध्वजाला अभिवादन करून पूजन झाल्यानंतर मोहिमेने दीक्षाभूमीकडे प्रयाण केले. तिथे रा.काँ.पा.अध्यक्ष दुनेश्वर पेठे, माजी आमदार प्रकाश गजभिए, ईश्वर बालबुधे, अनिल आहिरकर, महिला अध्यक्ष लक्ष्मी सावरकर, दिनेश बंग, प्रदेश युवक महासचिव सौरभ मिश्रा, ग्रामीण युवक अध्यक्ष श्याम मंडपे, नागपुर शहर युवक अध्यक्ष शैलेन्द्र तिवारी, सतीश इटकेलवार आदी उपस्थित होते. दीक्षाभूमीवर ‘स्वराज्य ध्वजा’चं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक आणि प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक, महिला भगिनी आणि युवा कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून ध्वजाची पूजा केली. तसेच नागपूरमध्ये माजी आमदार प्रकाश गजभिये यांच्या गणेश मंडळातही ‘स्वराज्य ध्वज’ नेऊन कार्यकर्ते आणि नागरिकांनी त्याची पूजा केली.गेले सहा दिवस राज्यातील सर्वच जातीधर्माच्या स्थानिकांचं आकर्षण बनलेला आणि शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची आठवण करून देणारा स्वराज्य ध्वज आज विदर्भातही चर्चेचं केंद्र बनला आहे. शिवाजी महाराजांनी जो स्वराज्य धर्म हयातभर पाळला, त्याच निष्ठेने महाराष्ट्राच्या प्रेरणादायी शानदार इतिहासाची देशाला ओळख करून देण्यासाठी तसेच शक्ती-भक्तीचा सर्वांगसुंदर संदेश समाजात पोहोचवण्यासाठी स्वराज्य ध्वज मोहिम वाटचाल करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून उतरलेल्या स्वराज्य ध्वजाने आज नागपुरातील प्रसिद्ध रामटेक मंदिरात श्रीरामचरणी वंदन केले. मंदिरात ध्वजाचे पूजन करण्यात आले. यावेळी
रा.काँग्रेसच्या ग्रामीण विभाग महिला जिल्हाध्यक्ष अर्चना ताई हरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव  दिनेशज़ी बंग, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर युवक अध्यक्ष सौरभजी मिश्रा, राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण विभाग युवक अध्यक्ष शैलेंद्र तिवारी, श्याम मंडपे, प्रवीण खाडे, डॉ. नितिन विरूलकर, नकुल बरबटे, देवीदास तडस, संदीप इवनाते, कपिल वानखेड़े आदी मान्यवर उपस्थित होते.

काल स्वराज्य ध्वज मोहिमेने वर्ध्याचा महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम, शेंडगावचे श्री संत गाडगेबाबा मंदिर, अमरावतीचा परकोट किल्ला, मोझरीचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज मंदिर आदी ठिकाणी भेट दिली होती. यापुढील प्रवासात हि मोहिम भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, चंद्रपूर, वाशिम, नांदेड, हिंगोली, जालना इत्यादी ठिकाणी पोहोचणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या नावीन्यपूर्ण संकल्पनेतून साकारलेल्या स्वराज्य ध्वजाला राज्यात ठिकठिकाणी आपुलकीच्या वातावरणात जल्लोषात प्रतिसाद मिळत आहे. या ध्वज पूजन मोहिमेने आज यशस्वी सहाव्या दिवसात पदार्पण केले आहे. आतापर्यंत आठ जिल्ह्यांना भेट देत सोमवार दि. १३ सप्टेंबर २०२१ रोजी स्वराज्य ध्वज मोहिमेचा प्रवास विदर्भात येऊन पोहोचला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते रोहित पवार यांची अनोखी संकल्पना असलेल्या स्वराज्य ध्वजाच्या या महत्त्वाकांक्षी प्रवासाला सुरूवात झाल्यापासून नगर, कर्जत-जामखेड, जुन्नर, नाशिक, धुळे, बुलढाणा, शेगाव, अमरावती अशा अनेक शहरातून स्थानिक जनतेने भरभरून उत्साही प्रतिसाद देऊन ठिकठिकाणी ध्वजाचे दिमाखात स्वागत केले आहे. स्वराज्यध्वजाच्या प्रवासाचा शुभारंभ अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील सद्गुरू संत श्री गोदड महाराज यांच्या मंदिरात ध्वजाचे मंगल पूजन करून झाला होता. जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ला, लेण्याद्री देवस्थान, ओझरचे विघ्नेश्वर देवस्थान, श्री साईबाबा संस्थान शिर्डी, सप्तश्रृंगी देवी मंदिर, याहमोगी माता मंदिर, शेगावचे संत गजानन महाराज मंदिर आदी ठिकाणी जाऊन ध्वज मोहिमेने आशिर्वाद घेतले आहेत.

सर्व जातीधर्मांच्या लोकांना हा स्वराज्य ध्वज आपलासा वाटत असून महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याच्या वैभवशाली इतिहासाची माहिती सर्वदूर पोहोचवण्यासाठी शहरा-शहरात जाणारा हा ध्वज मोहिमेचा संकल्प प्रवास मोठे योगदान देत आहे. लोकसहभागातून होणारा हा प्रवास कोरोना साथी संबंधित सर्व सामाजिक नियमांचे पालन करून होत आहे. हि ध्वज यात्रा एकूण ३७ दिवस प्रवास करणार आहे, या काळात राज्यातील अनेक प्रेरणास्थाने व श्रद्धास्थाने येथे आवर्जून भेट दिली जाणार आहे.

मानवतेचे आणि भक्ती-शक्तीचे प्रतिक असणारा हा स्वराज्य ध्वज सर्वच जाती-धर्माच्या लोकांसाठी स्फूर्तीदायी आहे. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एक अभिमान वीरपताका म्हणून भगव्या ध्वजाचं महत्त्व उल्लेखनीय आहे. महाराष्ट्राचा हा गौरवशाली संपन्न इतिहास युवावर्गासाठी कायमच प्रेरणादायी आहे. मात्र या अभिमानास्पद परंपरेची माहिती देशवासियांपर्यंत  पोहोचवण्याच्या उद्देशातून स्वराज्य ध्वज यात्रेचा संकल्प केल्याचं आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

भगवा ध्वज हा आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा तेजोमय साक्षीदार आहे. त्याला पाहताच मनात भक्ती,शक्ती, त्याग व शौर्याची भावना दाटून येते. विनम्रता, परमार्थ व त्याग शिकवणारा हा भगवा ध्वज महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याची ओळख अवघ्या देशात ठसवणा-या भगव्या ध्वजाला आपल्या परंपरेत धार्मिक, आध्यात्मिक, सामरिक महत्त्व आहे. याच कारणांमुळे तसेच कर्जत-जामखेडची नवी ओळख तयार करण्याच्या दृष्टीकोनातून आपण ही स्वराज्य ध्वजाची संकल्पना साकारत असल्याचं रोहित पवार यांनी सांगितलंय.

निजामाविरूद्ध शिवरायांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याचा विराट विजय झाला ती पावनभूमी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड येथील शिवपट्ट्ण अर्थातच खर्ड्याचा भुईकोट किल्ला. या किल्ल्यावरच स्वराज्यातील अखेरची परंतु विजयी लढाई खेळून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याने निजामाला मात दिली. या परिसराचे व किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून या परिसराला नवी ओळख देण्याचा संकल्प रोहित पवार यांनी केला आहे. याच प्रेरणेतून किल्ल्याच्या आवारात भव्य ध्वजस्तंभ साकार होत असून त्यावर देशप्रेमाची असीम ऊर्जा देणारा ७४ मीटर उंचीचा शौर्याचं प्रतिक असा भव्य-दिव्य भगवा स्वराज्य ध्वज फडकवण्यात येणार आहे. हा आगळा-वेगळा भगवा ध्वज देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात उंच ध्वज ठरणार आहे.

भगवा ध्वज हा आपल्या सर्वांचेच स्फूर्तीस्थान आणि अभिमान आहे. अत्यंत ऊर्जादायी असा हा भगवा रंग सर्वांसाठीच सहिष्णुतेचा, समानतेचा आणि एकीचा संदेश देणारा आहे. देशाचे भवितव्य असलेल्या युवा शक्तीला प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी हा ध्वज सकारात्मक विचार व प्रेरणा

देईल असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ६ जून १६७४ मध्ये झालेल्या राज्याभिषेकाचे स्मरण म्हणून या ध्वजाची उंची ७४ मीटर ठेवण्यात आली आहे. या ध्वजाचा आकार ९६*६४ फूट असून वजन ९० किलो आहे. तर ध्वजस्तंभाची उंची देखील ७४ मीटर असून तो ९० टन वजनाचा आहे.

दस-याच्या शुभमुहूर्तावर १५ ऑक्टोबर रोजी या स्वराज्य ध्वजाची प्रतिष्ठापना होत असून तत्पूर्वी राजर्षी शाहू-ज्योतिबा फुले-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, प्रमुख देवस्थानांसह देशातील प्रमुख संतपीठे, शौर्यपीठे आणि धार्मिक पीठे तसेच श्रीराम मंदिर (अयोध्या), मथुरा, बोधगया(बिहार), केदारनाथ(उत्तराखंड), आग्रा किल्ला, अजमेर शरीफ दर्गा(राजस्थान), महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड(तिसरे), बडोदा संस्थानचे अधिपती, गुजरात अशा ७४ वंदनीय ठिकाणी नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे. या सर्वसमावेशक ध्वजाचे सर्वांनीच प्रातिनिधीक पूजन करावे हि या प्रवासामागील लोकभावना आहे. त्यासाठी ६ राज्यांतील १२ हजार कि.मी असा सलग ३७ दिवस या ध्वजाचा प्रवास होईल. त्यानंतर शिवपट्टण किल्ल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रेरणादायी ध्वजाची मानाने प्रतिष्ठापना होईल.

हि स्वराज्य ध्वज पूजन यात्रा पूर्णपणे लोकसहभागातून आणि सहकार्यातून संपन्न होणार आहे. यासंबंधीची अधिक माहिती https://rohitpawar.org/swarajyadhwaj/  या संकेतस्थळावर पाहाता येईल. अधिक माहितीसाठी ९६९६३३०३३० या क्रमांकावर संपर्क करा.