तब्बल १७ वर्षानंतर भेट, कलावती बांदूरकर यांनी राहुल गांधींचे मानले आभार

0
32

वाशिम,दि.15ः- शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कलावती बांदूरकर या शेतमजूर महिलेची सतरा वर्षांपूर्वी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी भेट घेतली होती. सध्या राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने विदर्भात दाखल झाले आहेत. वाशीम येथे आयोजित बिरसा मुंडा जयंती सोहळ्यात कलावती बांदूरकर यांनी आभार मानले.चंद्रपूर-वणीचे खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभा धानोरकर यांनी १७ वर्षानंतर ही भेट घडवून आणली.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कलावती बांदूरकर कापूस वेचण्याचे काम करतात. २००५ मध्ये त्यांचे पती परशुराम बांदुरकर यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांना भेट दिली. त्यानंतर त्यांना मदतीचा ओघ देखील सुरू झाला आणि यवतमाळ जिल्ह्यातला जळका गाव प्रसिद्ध झाले. या घटनेला सतरा वर्षे पूर्ण झाली आहेत. दरम्यान, राहुल गांधी महाराष्ट्रात असल्याच्या पार्श्वभूमीवर काही माध्यमांनी कलावती बांदूरकर सध्या काय करतेय? असा प्रश्न उपस्थित केला.

यानिमित्त चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी बांदूरकर कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्या आयुष्यातील अनेक खडतर प्रवासाविषयी जाणून घेतले आणि असलेल्या समस्यांविषयी देखील चर्चा केली. त्यानंतर आज कलावती बांदूरकर यांनी वाशीम येथे राहुल गांधी यांची भेट घेतली आणि आभार मानले.