बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?

0
27

अमरावती : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील सत्तांतरानंतर शेतकऱ्यांसाठी प्रभावी योजना राबविल्या जात असतानाच आता विरोधकांकडून माजी आमदार तथा बँकेचे विद्यमान अध्यक्ष बच्चू कडूंना बँकेच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे यांनी केला आहे. विशेष म्हणजे या हालचालींमागे राज्य शासन आणि काँग्रेसमधील छुपी युती असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून या बँकेवर काँग्रेसची मक्तेदारी राहिली आहे ,दोन वर्षांपूर्वी बच्चू कडू (Bachu Kadu) यांच्या नेतृत्वात सत्तांतर झाल्यानंतर शेतकऱ्यांसाठी अनेक लाभदायक योजना बँकेमार्फत राबवल्या गेल्या. परंतु यामुळे बँकेवरील विरोधकांची मक्तेदारी संपल्याने, त्यांच्याकडून सातत्याने कारवाया सुरू असल्याचा आरोप बँकेच्या सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, विभागीय सहनिबंधकांनी नाशिक येथील न्यायालयाच्या शिक्षेचा संदर्भ देत बच्चू कडू (Bachu Kadu) यांना संचालक पदाकरिता अपात्र ठरवले असून, या निर्णयाविरोधात बच्चू कडू यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने त्यांना दिलासा देत विभागीय सहनिबंधकांचे आदेशावर स्थगिती दिली आहे.

बच्चू कडू (Bachu Kadu) यांच्या माध्यमातून शेतकरी व दिव्यांग व सर्वसामान्यांच्या मागण्यांसाठी शासनावर दबाव टाकल्या जात आहे याचाच वचपा काढण्याकरिता त्यांना बँकेचे अध्यक्ष पदावरून काढण्याची प्रकार म्हणजे” राज्य शासन आणि काँग्रेसचा नियोजित कट आहे, , राज्य शासनाच्या दबावाखाली घेतलेले निर्णय आहेत. काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांपेक्षा बँकेवरील सत्ता अधिक महत्त्वाची वाटते,” असा थेट आरोप पत्रकार परिषदेतून करण्यात आलेला आहे. “आमचा संघर्ष हा केवळ सत्तेसाठी नसून, शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी आहे. तो संघर्ष आम्ही शेवटपर्यंत लढणार,” असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला.

अध्यक्ष व बच्चू कडू यांच्या नेतृत्वात घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय

कर्ज वाटपामध्ये बँकेने मागील दोन वर्षांमध्ये बँकेला दिलेल्या लक्षांकाच्या एकूण 104% पूर्तता केलेली असून सन 2023 मध्ये रुपये 589 कोटी तर सन 2024 ला 647 कोटीचे वाटप केलेले आहे व यावर्षी सुद्धा 611 कोटीचे वाटप पूर्ण झाले असून सप्टेंबर 2025 पर्यंत बँकेला 750 कोटी कर्ज वाटपाचे लक्षांक आहे. दोन वर्षाच्या काळामध्ये बँकेने शेतकरी हिताच्या व शासनाची सबसिडी असलेली एन एल एम, सौर ऊर्जा कर्ज योजना, एज्युकेशन लोन,गोडाऊन कर्ज योजना ,नेट शेड या योजना नव्याने सुरू केलेल्या आहे.