29.6 C
Gondiā
Saturday, July 25, 2026
Home Top News विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत ; हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी- राहुल गांधी

विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत ; हिंसाचारातील दोषींवर कठोर कारवाईची केली मागणी- राहुल गांधी

0
4

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचे सांगत केंद्र सरकारवर तीव्र टीका केली आहे. देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांनी लोकशाही व संविधानाच्या चौकटीत राहून दिलेल्या लढ्याचे कौतुक करत त्यांनी या घडामोडीला शिक्षण व्यवस्थेतील बदलाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचे म्हटले.

राहुल गांधी यांनी त्यांच्या एक्स (X) अकाऊंटवर प्रतिक्रिया व्यक्त करत, देशाच्या भविष्याचे संरक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरून ठाम भूमिका घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी आणि तरुणाचा देशवासीयांना अभिमान वाटला पाहिजे, असे नमूद केले.

 

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे स्वागत करताना त्यांनी दोन प्रमुख मागण्या अद्याप प्रलंबित असल्याचे स्पष्ट केले. पहिली म्हणजे, पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या भविष्याचा सन्मान राखत देशाची माफी मागावी. दुसरी म्हणजे, आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.

केंद्र सरकारवर निशाणा साधताना राहुल गांधी म्हणाले की, शेतकरी, मजूर आणि गरीब वर्गावर अन्याय झाल्याचा आरोप त्यांनी केला आणि या सर्वांनी आपल्या स्वाभिमानासाठी घटनात्मक मार्गाने एकत्र येऊन ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत राहुल गांधी म्हणाले की, लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्यानंतर मध्यरात्री ‘रील्स’ बनवून वेळ घालवण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर उत्तर देणे आवश्यक आहे. शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा एक टप्पा असला तरी दोषींवर कारवाई आणि पंतप्रधानांची माफी याशिवाय दुसरे कोणतेही समाधान स्वीकारले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आपल्या संदेशाच्या शेवटी राहुल गांधी यांनी देशातील नागरिकांना “घाबरू नका” असे आवाहन करत, या सरकारला सत्तेतून हटवण्याची वेळ आता आली असल्याचा दावा केला.

blank