युवकांनी सोशल मीडियाचा वापर कमी करुन आपल्यातील कला वृद्धींगत कराव्यात – क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार

0
14

अमरावती, दि 23 : युवा देश म्हणून भारताची जगात ओळख आहे.  मानवी संसाधने आपल्या देशात अधिक आहेत.  युवकांचा आय.क्यु. जुन्या पिढीपेक्षा अधिक आहे, असे असतांना आमचे युवक सोशल मिडीयाचा जास्तीतजास्त वापर करीत असून त्यावर मर्यादा घालून आपल्यातील कला वृद्धींगत कराव्यात, असे आवाहनात्मक प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनिल केदार यांनी केले.  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने आजादी का अमृत महोत्सव वर्षात शैक्षणिक सत्र 2021-22 मध्ये अखिल भारतीय विद्यापीठ संघाकडून मान्यता प्राप्त कलाप्रकारांकरिता व नियमानुसार आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव स्पर्धेचे आयोजन दि. 22 एप्रिल ते 25 एप्रिल, 2022 दरम्यान ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय, अमरावती याठिकाणी करण्यात आले, त्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.  व्यासपीठावर अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, प्रमुख अतिथी म्हणून ब्रजलाल बियाणी शिक्षा समितीचे अध्यक्ष अॅड. अशोक राठी, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजीव बोरकर, संयोजक तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिपक धोटे, नियोजन समितीचे अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल गवई, युवा महोत्सव समितीचे समन्वयक डॉ. संजीव ई·ारकर, माजी संचालक डॉ. दिनेश सातंगे, प्राचार्य डॉ. अंजली ठाकरे, विद्यार्थी परिषद अध्यक्ष श्री राहुल सोळंके आदी उपस्थित होते.

उद्घाटन झाल्याची घोषणा करुन मार्गदर्शन करतांना श्री.सुनिल केदार म्हणाले, नवीन पिढीचा आय.क्यु. जास्त आहे.  भारताचा विकास नवीन पिढीच्या खांद्यावर आहे.  तंत्रज्ञानाने भारतात क्रांती केली असून त्याचा जास्तीतजास्त वापर आपल्या देशात होत आहे.  परंतू आमचा युवक वर्ग सहा ते सात तास वेळ फेसबुक व व्हाट्सअॅप वर खर्ची घालतो, त्यातल्या त्यात यामध्ये मध्यम वर्गातील विद्यार्थी बळी पडत असून युवकांनी जागृत होवून सोशल मीडीयाच्या वापरावर मर्यादा ठेवावी आणि आपल्यातील असलेल्या कलाकौशल्यांना वृद्धींगत करण्याकरिता अधिकाधिक वेळ द्यावा.

विद्यापीठ स्तरावर टेक्नॉलॉजीचा कसा वापर करायचा, याचे धडे विद्यार्थ्यांना दिल्या जाईल, अशी अपेक्षा व्यक्त करुन ते पुढे म्हणाले, विदेशात क्रीडा कौशल्याला अधिक महत्व दिले जाते.  महाराष्ट्रात देखील स्थापन झालेल्या क्रीडा विद्यापीठाच्या माध्यमातून मैदानी खेळांसह इतर कलाप्रकारांचे आयोजन मोठ्या प्रमाणावर करण्यात येईल.  त्यामध्ये अधिकाधिक खेळाडूंचा सहभाग असण्यावर भर दिला जाईल, असे सांगून युवा महोत्सवात सहभागी सर्व कलावंत विद्याथ्र्यांना आपल्या कला उत्कृष्टरितीने सादर करण्याकरिता व विजेता होण्याकरिता त्यांनी शुभेच्छा दिल्यात.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाने युवा महोत्सव आयोजनाची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद दिले.  ते पुढे म्हणाले, विद्यापीठ परिक्षेत्रातील महाविद्यालयांमध्ये अडीच लाख विद्यार्थी असून त्यापैकी अडीच हजार विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.  ही संख्या जास्तीतजास्त वाढविण्याची गरज असून पुढील वर्षी अधिकाधिक कलावंत विद्यार्थी सहभागी होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  विद्यापीठातून दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांपैकी चाळीसहजार विद्यार्थी पदवी घेवून बाहेर पडतात आणि साठहजार विद्यार्थ्यांना पदवी मिळत नाही.  साठ हजारांचा आकडा कमी होण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व चॉईस बेस्ड क्रेडीट सिस्टीम (सी.बी.सी.एस.) पद्धत महत्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांना अधिक रोजगारक्षम बनविण्यावर भर दिला जाणार असून ऑनर्स व मायनर डिग्री देण्याचा प्रयत्न या माध्यमातून होईल.  याशिवाय कौशल्य अभ्यासक्रमांचा समावेश, अभ्यासक्रमांसाठी प्रोजेक्ट व इंटर्नशीपची सक्ती असणार आहे.  विद्यापीठात प्लेसमेन्ट सेलची निर्मिती, संशोधनासाठी अनुदान, पूर्णवेळ आचार्य पदवीकरिता संशोधक, मराठीमध्ये बी.एस.सी. आदी सुधारणा करण्यात येणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.  विद्यापीठाच्या खेळाडूंनी आपल्या स्तरावर गौरवास्पद कामगिरी करुन विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.  याप्रसंगी सर्व सहभागी कलावंतांना कुलगुरूंनी शुभेच्छा दिल्यात.

संयोजक तथा ब्रजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिपक धोटे यांनी स्वागतपर भाषणात सांगितले, महाविद्यालयाचे यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे.  दोन कोटीपेक्षा जास्त रूपयाचे इनडोअर स्टेडियम महाविद्यालयात तयार होणार असून त्याचे भूमीपूजन मंत्री महोदायांच्या हस्ते संपन्न झाले.  महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा युवा महोत्सवामध्ये जास्तीतजास्त सहभाग होण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाला एक लक्ष रूपयाचे सानुग्रह अनुदान क्रीडा व युवक कल्याण विभागाच्यावतीने दिल्या जावे, अशी मागणी त्यांनी याप्रसंगी केली.  सांस्कृतिक कार्यक्रमाध्ये सहभागी विद्यार्थ्यांना नॉन एक्झामिनेशनसाठी क्रेडीट मिळावे, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविकतेतून संचालक डॉ. राजीव बोरकर यांनी युवा महोत्सव आयोजनामागील भूमिका विशद केली.  पाच प्रमुख कलाप्रकारांत व पस्तीस उप कलाप्रकारांत विद्यार्थी आपल्या कलेचे सादरीकरण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.  125 महाविद्यालयांचा यामध्ये सहभाग असणार आहे.  याप्रसंगी ब्रजलाल बियाणी शिक्षा समितीचे अध्यक्ष अॅड. अशोक राठी यांनी मनोगत व्यक्त केले.

विद्यापीठ गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.  यावेळी मागीलवर्षी शासकीय विदर्भ ज्ञान व विज्ञान संस्थेने उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल तेथील डॉ. सुधीर मोहोड व डॉ. विनोद गावंडे यांचा यावेळी शाल, श्रीफळ देवून मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  पुष्पगुच्छ देवून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. संचालन डॉ. क्षिप्रा मानकर यांनी, तर आभार डॉ. संजीव ई·ारकर यांनी मानले.  उद्घाटन कार्यक्रमाला ब्रजलाल बियाणी शिक्षा समितीचे पदाधिकारी, नियोजन समितीचे सदस्य, युवा महोत्सव व्यवस्थापन समितीचे सदस्य, सर्व संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यापीठाच्या विविध प्राधिकारणींचे सदस्य, पत्रकार, युवा महोत्सवामध्ये सहभागी कलावंत विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.