आमदार आत्रामांना नक्षलवाद्यांकडून धमकी, अजित पवार अधिवेशनात म्हणाले…

0
21

नागपूर-गडचिरोलीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना नक्षलवाद्यांकडून धमकी आली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या धमकीचा मुद्दा थेट विधानसभा अधिवेशनात उपस्थित केला. तसेच या धमकीची गंभीर दखल घेत आमदार आत्राम यांना सुरक्षा कडक सुरक्षा व्यवस्था देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी मधल्या काळात गडचिरोलीत ८० वाहनांची जाळपोळ झाल्याचंही नमूद केलं.

अजित पवार म्हणाले, “सभागृहातील सर्व सदस्यांचे संरक्षण करणे, त्यांची सुरक्षेबाबत काही अडचण असेल तर त्यात लक्ष देऊन निर्देश देणं हा सभागृह अध्यक्षांचा अधिकार आहे. नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा लोकशाहीला आव्हान दिलं आहे. गडचिरोलीचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्यासह प्रशासनाला थेट धमकी देण्यात आली आहे.”भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या (माओवादी) पश्चिम झोन कमिटीचा सदस्य असलेल्या श्रीनिवास नावाच्या नक्षलवाद्याने थेट प्रेस नोट काढली आहे. त्यात आमदार आत्राम यांच्यासह प्रशासनाला धमकी दिली,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

अजित पवार पुढे म्हणाले, “गडचिरोली तसा मागास आदिवासी जिल्हा आहे. तिथं सुरजागड येथे लोह-खनिज प्रकल्पावरून नक्षलवाद आणि प्रशासन असा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. आता नक्षलवाद्यांकडून तेथील लोकप्रतिनिधींना धमक्या मिळत आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. सुरजागडला मागील पाच वर्षांपासून हा प्रकल्प सुरू आहे. त्याला स्थानिक प्रतिनिधींकडून नेहमीच विरोध होत आहे. मधल्या काळात ८० वाहनांची जाळपोळ झाली आहे.”

“शरद पवार मुख्यमंत्री असताना तेव्हाही नक्षलवाद्यांनी बाबा आत्राम यांचं अपहरण केलं होतं. नंतर चर्चा करून त्यांना सोडलं होतं. बाबा आत्राम असो की कोणीही इतर लोकप्रतिनिधी असो, अशावेळी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन सभागृहाच्या नेत्यांनी ताबडतोब आत्राम यांची सुरक्षा वाढवावी. त्यांना योग्य बंदोबस्त द्यावा. केवळ आत्राम नाही, तर प्रशासनालाही सुरक्षा द्यावी. प्रशासनाला वाऱ्यावर सोडलं जातं असं वाटलं तर त्यांचाही विश्वास उडेल. तसंही होता कामा नये. राज्य सरकारने कठोरातील कठोर भूमिका घेतली पाहिजे,” असंही अजित पवारांनी नमूद केलं.