नागपूर,दि.13ः काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री व आमदार सुनील केदार यांना 2017 च्या प्रकरणात न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण करणे त्यांना भोवले.महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी 2017 मध्ये न्यायालयाने हा निकाल दिला आहे. केदारसह अन्य तिघांनाही न्यायालयाने शिक्षा सुनावली. या विरोधात केदार उच्चन्यायालयात जाणार आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यत सुनील केदार व त्यांच्या सहकाऱ्यांना जिल्हा व सत्र न्यायालयातून जमानत मिळवावी लागणार आहे. जमानत न मिळाल्यास त्यांना सोमवारपर्यत कोठडीत राहावे लागू शकते. हे लक्षात घेता केदार जमानत मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
2017 मध्ये तेलगाव येथील शेतकरी हबीब शेख आणि महावितरणचे अधिकारी यांच्यात ट्रान्समिशन लाइन टाकण्यावरून वाद झाला होता. वाद मिटवण्यासाठी सुनील केदार आपल्या समर्थकांसह गावात पोहोचले होते. मात्र शेतकऱ्यांवरून सुरू झालेला वाद आमदार केदार यांच्यापर्यंत पोहोचला. अदानीची टाॅवर लाईन शेतकऱ्यांच्या शेतातून जात होती. मात्र, अदानी नुकसानीपेक्षा कमी मोबदला देत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष होता.
तेलगाव येथील हबीब शेख या शेतकऱ्याचा यावरून अदानी तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांशी वाद सुरू होता. हा वाद केदारांना माहिती होताच ते घटनास्थळी गेले होते. त्यांच्यासोबत वैभव घोंगे, मनोहर कुंभारे, दादाराव देशमुख हेही होते. यावेळी केदार यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारले होते. त्याविरोधात अधिकाऱ्यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याच्या कारणाखाली केळवद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. केदारांविरूद्ध भादंवि कलम 353 नुसार गुन्हा दाखल केला होता.





