गौतमी पाटीलने आडनाव का काढावे, माधुरी दीक्षितला हा सल्ला कुणी दिला नाही; सुषमा अंधारे नृत्यांगनेच्या पाठिशी

0
16

छत्रपती संभाजीनगर-गौतमी पाटील आणि वाद हे समीकरण आता जुळून आले आहे. कधी अश्लील नृत्य म्हणून बहिष्कार, कधी व्हायरल झालेली व्हिडिओ क्लीप, तर कधी अजित पवारांची टोलेबाजी. आता मात्र, गौतमीने पाटील हे आडनाव लावू नये, अशी मागणी मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी केली आहे. गौतमीचे आडनाव चाबूकस्वार आहे. ती पाटील आडनाव लावून पाटलांची बदनामी करते आहे. त्यामुळे तिने आडनाव लावू नये, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा तिला देण्यात आला आहे.

मात्र, याविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे मैदानात उतरल्यात. आजवर माधुरी दीक्षित, ममता कुलकर्णी किंवा माधुरी पवारला हा आडनाव बदलण्याचा सल्ला कुणी दिला नाही. मग हा सल्ला किंवा ही धमकी गौतमी पाटीललाच का, असा सवाल त्यांनी केला आहे.

आडनावात खूप दडले

सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्ट लिहून आपली भूमिका सविस्तर मांडली आहे. त्या पोस्टमध्ये अंधारे म्हणतात की, नावात काही आहे की नाही यावर खूप चर्चा झाली. पण आडनावात काही आहे का नाही. तर निश्चितपणे आडनावात खूप काही दडले. आडनावात वर्णश्रेष्ठतावाद आहे. चातुर्वर्ण्य व्यवस्थेनुसार ब्राह्मणवर्णातील आडनाव ही विद्यामय असावीत. क्षत्रिय वर्णीयांची आडनावे वीरमय, वैशांची आडनावे ही व्यापारमय असावी, तर शूद्रांची आडनावे ही निंदनीय असावीत असे गृहीतक आहे. ‘ढोरगवार पशु शूद्र नारी सब ताडन के अधिकारी’ ही ओळ ही एका अर्थाने शूद्र स्त्रिया किंवा जनावरे यांना एकाच तराजूत तोलावे अशा आशयाची येते. शूद्र वर्णांमध्ये बहुतांश आडनावे हि पशूंच्या नावावर दिसतात जसे डुकरे, बैले, पारवे हत्तीआंबिरे, मांजरे, निळे , हिरवे इ.

जात व्यवस्थेची दाहकता

सुषमा अंधारे म्हणतात की, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धानंतर वर्णव्यवस्था तितकीशी जाणवत नाही. मात्र, जात व्यवस्थेची दाहकता आजही टिकून आहे. ग्रामीण भागात ती विशेषत्वाने जाणवते. त्यामुळे ग्रामीण भागातून स्वतःला आजमव पाहणारी आणि अत्यंत उपेक्षित व पीडित वर्गातून येणारी नवी पिढी बऱ्याचदा आडनावे बदलून नागरवस्तीमध्ये स्वतःला सिद्ध करू पाहतात. एका अर्थाने अशा पद्धतीने आडनावे बदलून लोकांना राहावे लागते हे भारतीय समाज व्यवस्थेतील जाती व्यवस्था घट्ट करू पाहणाऱ्यांचा विजयच म्हणावा लागेल.

बौद्धांनी आडनावे बदलली

सुषमा अंधारे म्हणतात की, आंबेडकरी चळवळतील अत्यंत ज्येष्ठ साहित्यीक आणि महत्त्वाचे नाव म्हणजे बाबुराव बागुल यांचे. “जेव्हा मी जात चोरली होती” हे पुस्तक या अर्थाने प्रचंड महत्त्वाचे ठरते.” जयसिंगपूर मधील अनेक बौद्धांनी आपली आडनावे भाटिया, कुलकर्णी किंवा कर्णिक केलेली आढळतात. तर नागपूरकडे अनेक बौद्धांनी आडनावे पाटील अशी लावलेली आहेत. जळगाव, धुळे, चाळीसगाव या भागामध्ये भटक्या विमुक्त आतील अनेक जात समुदायातील आडनावे ही मूळची वेगळी मात्र नंतर पाटील लावलेली दिसतात.

सवर्णांची होते अडचण

सुषमा अंधारे म्हणतात की, थोडक्यात काय तर हा सगळा आटापिटा जात ओळखली गेली तर कदाचित आपली संधी डावल्ली जाईल की काय या भीतीपोटीचा. यात अजून एक वेगळ्या प्रकारची माणसे पण आहेत की जी मूळ प्रस्थापित आहेत किंवा जी सवर्ण आहेत. मात्र, त्यांची आडनावे त्यांना काहीशी अडचणीची वाटतात आणि म्हणून आडनावांच्या सोबत ते पाटील असेही बिरूद लावतात. उदाहरणार्थ माझ्या वर्गात माझ्यासोबत शिकणारा एक मुलगा त्याचे संपूर्ण इंजिनिअरिंग पर्यंतचे शिक्षण होईपर्यंतचे आडनाव गाढवे होते. मात्र, मागील दोन वर्षात त्याने त्याचे आडनाव गाढवे पाटील असे केले किंवा एखाद्याचे आडनाव काळोखे असेल तर काळोखे पाटील करणे किंवा कोळसे असेल तर कोळसे पाटील करणे आवारे असेल तर आवारे पाटील करणे…

सल्ला की धमकी

सुषमा अंधारे म्हणतात की, गौतमी पाटील प्रकरणात मात्र अजूनच वेगळी गंमत आहे. तिला असलेले पाटील आडनावच काढून टाकायला सांगितले जात आहे. इथेही बाब उल्लेखनीय आहे की नृत्यांगना असणाऱ्या माधुरी दीक्षित यांना कधीही दीक्षित आडनाव काढण्याचे सल्ले कुणी दिले नाही किंवा ममता कुलकर्णी यांनाही कुलकर्णी आडनाव काढून टाकण्याचे सल्ले दिले नाही. अगदी माधुरी पवारला सुद्धा पवार आडनाव काढण्याचे सल्ले दिले गेले नाही मग हा सल्ला किंवा ही धमकी गौतमी पाटीललाच का बरे..?

नजर दूषित आहे

सुषमा अंधारे पुढे म्हणतात की, एखाद्या मुलीला, माय माऊलीला तिच्या उदरनिर्वाहासाठी एखादे असे काम करावे लागते की, जे काम व्यवस्थेला घृणास्पद वाटते तर याचा अर्थ असा आहे की एक तर तुमची नजर दूषित आहे . ती सुद्धा तुमच्यासारखीच दोन हाताची दोन पायाची माणूस आहे, पण तिचं माणूस पण स्वीकारणे तुम्हाला जड जातय किंवा तिला तिथपर्यंत पोहोचायला भाग पाडणारी त्याला जबाबदार तुमची अपयशी अर्थव्यवस्था आहे. आणि हे अपयश झाकण्यासाठी तुम्ही तुमच्या मनगटबळाच्या जोरावर अशी दडपशाही करता.