
लातूर:-लातूर-सोलापूर महामार्गावर अपघाताची श्रृंखला काही थांबण्याचे नाव घेत नाही. चार दिवसांपूर्वी माजी आमदार आर टी देशमुख यांचाही अपघात लातूर सोलापूर महामार्गावर झाला. त्या अपघात स्थळापासून काही अंतरावरच आज पहाटे पुण्यावरून लातूरला येणाऱ्या दोन ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात झाला आहे. तुळजापूर लातूर महामार्गावरील आशीव पाटी येथे हा अपघात झाला. अपघातात 15 ते 20 जण गंभीर जखमी, तर दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातस्थळी पोलीस दाखल झाले असून रुग्णवाहिकेद्वारे रुग्णांना हलवण्याचे काम सुरू झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यावरून लातूरकडे येत असलेल्या एका ट्रॅव्हल्स ने दुसऱ्या ट्रॅव्हल्स ला पाठीमागून धडक दिली आहे. हा अपघात तुळजापूर-लातूर या राष्ट्रीय महामार्गावरील आशीव पाटी येथे झाला आहे. अपघातात 15 ते 20 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातस्थळी पोलीस दाखल झाले आहेत. आत्तापर्यंत 5 रुग्णवाहिका अपघात स्थळी दाखल झाल्या आहेत. रुग्णांना लातूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्याचे काम सुरू आहे.
चारच दिवसांपूर्वी भाजपचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांचा याच लातूर-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला होता. ज्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. अपघात नेमका कसा झाला? याबाबत वाहन चालकाने माहिती दिली. लातूर-सोलापूर महामार्गावर पाणी साचले आणि पाणी उडून काचेवर आले. यामुळे चालकास समोरचे काही दिसले नाही. अचानक ब्रेक लावला. यामुळे गाडी घसरत जाऊन पलटी झाली. गाडीने चार पलट्या खाल्ल्या. रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला, अशी माहिती चालकाने दिली. या अपघातात माजलगावचे माजी आमदार आर. टी. देशमुख यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला नेले जात होते. पण या दरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. आर. टी. देशमुख यांना पुढील उपचारासाठी लातूरच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.