
राजू शेट्टींचा गंभीर आरोप!!खडसेंचाही दुजोरा,
नेमका घपला कशाचा?
जळगाव:-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी एक मोठा आरोप केला आहे. राज्यातील कारागृहांमध्ये 500 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा त्यांचा आरोप आहे. जळगावमधील साई मार्केटिंग कंपनी आणि तिचे संचालक सुनील जवळ यांचाही यात सहभाग असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे यांनीही या आरोपांना दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, या घोटाळ्यातील ठेकेदार एका मंत्र्यांच्या जवळचा आहे. लवकरच पावसाळी अधिवेशनात या घोटाळ्याचे पुरावे सादर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
राज्यात महायुती सरकार आल्यानंतर लगेचच 500 कोटींचा घोटाळा झाला, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, “राज्यातील जिल्हा कारागृहांमध्ये जेवण आणि इतर वस्तूंच्या खरेदीत हा घोटाळा झाला आहे.” बाजारात असलेली किंमत आणि दाखवलेली किंमत यात खूप फरक आहे, असंही त्यांनी सांगितलं.या घोटाळ्यात जळगावमधील मंत्री गिरीश महाजन यांच्या जवळचे समजले जाणारे साई मार्केटिंगचे संचालक सुनील जवळ यांचे नाव राजू शेट्टी यांनी घेतले आहे. त्यामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
रेशन, कॅन्टीन आणि विद्युत उपकरणांच्या खरेदीत 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता. एकनाथराव खडसे यांनीही प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, “राजू शेट्टी यांनी जे आरोप केले आहेत, ते जळगाव जिल्ह्यातील एका मंत्रांच्या जवळच्या ठेकेदारावर आहेत.” जळगावच्या कारागृहात कैद्यांना मिळणारे जेवण अतिशय वाईट दर्जाचे असते. “ते अन्न जनावरं सुद्धा खाऊ शकत नाहीत,” असंही खडसे म्हणाले. राजू शेट्टी यांनी राज्यभरातील कारागृहांमधील 500 कोटींचा घोटाळा उघडकीस आणला आहे. यात जळगावच्या एका मंत्र्यांच्या निकटवर्तीयांचाही समावेश असल्याचं खडसे यांनी सांगितलं.
खडसे यांच्याकडे या घोटाळ्याचे सर्व पुरावे आहेत. ते म्हणाले, “येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा पुराव्यांसकट मांडणार असून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे.” राज्यभरात या पाच ठेकेदारांनी मिळून एक साखळी तयार केली आहे. हे लोक जिल्हा कारागृहांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवतात. जळगाव जिल्ह्यातील एका मंत्र्याच्या आशीर्वादाने एका ठेकेदाराने हा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप एकनाथराव खडसे यांनी केला आहे. मात्र, एका वृत्तपत्रातील बातमीचा संदर्भ देत त्यांनी ही माहिती दिली. संबंधित मंत्री आणि ठेकेदाराचे नाव त्यांनी उघड केले नाही.
आता या जळगावच्या ठेकेदारावर खरंच चौकशी होऊन कारवाई होते की मंत्र्यांच्या आशीर्वादाने त्यांचे खिसे भरले जातात, हे पाहणं महत्त्वाचं आहे. या सगळ्या प्रकरणावर आता सरकार काय भूमिका घेतं, हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसेच, राजू शेट्टी आणि एकनाथराव खडसे यांनी केलेले आरोप किती खरे आहेत, हे चौकशीनंतरच स्पष्ट होईल.