समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात;एकाच कुटुंबातील चार जणांचा करुण अंत

0
47

एकाची प्रकृती चिंताजनक

वाशिम:-समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र काही केल्या थांबत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झाला, ज्यात नागपूरच्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतक नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील रहिवासी आहे. हे सर्वजण पुण्याहून नागपूरला परत येत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जैसवाल कुटुंब पुण्यात एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. गुरुवारी ते आपल्या कारने नागपूरकडे परत येत असताना, रात्री ९ च्या सुमारास वाशिम जिल्ह्यात त्यांच्या चालकाचा कारवरील ताबा सुटला. गाडी अनियंत्रित होत महामार्गावर धडकली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, गाडीच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. घटनास्थळावरच आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघाताची माहिती मिळताच वाशिम पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गंभीर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांनी अपघाताची नोंद घेत तपास सुरु केला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गाडीचा वेग जास्त असल्याने चालकाचा ताबा सुटल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, चालकाला डुलकी आली असण्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. समृद्धी महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांनी पुन्हा एकदा प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन, तसेच गाड्यांची नियमित तपासणी, चालकांच्या विश्रांतीला महत्त्व देणे, यासारख्या बाबींकडे प्रशासनाचे आणि वाहनचालकांचे लक्ष असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या अपघातामुळे जैसवाल कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या उमरेडमधील घरी शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.