मुंबई, दि. 5 – कर्जमाफी आमचा विषय आहे, त्यासाठी हायकोर्टाने सांगण्याची गरज नाही. राज्य सरकार त्यासाठी सक्षम असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. उत्तर प्रदेशात कर्जमाफी जाहीर करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्रात कर्जमाफी कधी जाहीर होणार असा सवाल विरोधकांकडून विचारला जात आहे. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीवर विधानसभेत निवेदन दिले.
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, ‘राज्य सरकारही शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. कर्जमाफी कशी देता येईल यावर चर्चादेखील सुरु आहे’. उत्तर प्रदेशात जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीवर बोलताना ‘उत्तर प्रदेशने कर्जमाफी केल्यानंतर, मी अर्थसचिवांना उत्तर प्रदेशकडून माहिती मागवण्याचे आदेश दिले आहेत. कर्जमाफीचं मॉडेल काय, ते पैसे कुठून आणि कसा उभा करणार याची माहिती घेण्यास सांगितलं आहे’, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.