अन् केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवत केली अटक

0
404

मुंबई(डेस्क न्युज)ः– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधातील वक्तव्यावरून राज्य पेटले असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्र्यांच्या विरोधात रायगड, पुणे, आणि नाशिकसह जळगावात एफआयआर नोंदवण्यात आला होता. याच दरम्यान, राणेंना रत्नागिरीत पोलिसांनी अटक केली. यानंतर नारायण राणे यांना संगमनेर पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. यापूर्वी त्यांना रत्नागिरी कोर्टात हजर करण्यासाठी नेले जात असल्याचे सांगण्यात आले होते.

नारायण राणे यांना अटक करण्यासाठी गेलेले पोलिस

नारायण राणे यांना अटक करण्यात आली त्याच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी काहीसा गोंधळ निर्माण झाला होता. या दरम्यान पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादही झाला. नारायण राणे यात जेवताना दिसून आले. या घटनेबद्दल भाजप नेते प्रसाद लाड यांनी एक ट्विट देखील केले आहे.

जनआशीर्वाद यात्रा एका दिवसासाठी स्थगित

नारायण राणे यांच्या अटकेनंतर भाजपची जन आशीर्वाद यात्रा आजच्या दिवसापुरती स्थगीत करण्यात आली आहे. आता या यात्रेचे रुपांतर अंादोलनात झाल्याचे यात्रा प्रमुख प्रमोद जठार यांनी सांगितले आहे.

मुंबईत शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज
तत्पूर्वी मुंबईतील जुहू परिसरात युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी नारायण राणेंच्या विरोधात आंदोलन करत आहे. यावेळी शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे दिसून आले.या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र, कार्यकर्ते एवढे आक्रमक झाले होते की, त्यांच्यामध्ये जोरदार राडा झाला. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज केला.

राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक आक्रमक

राणे हे राज्यसभेचे खासदार आहेत, त्यामुळे पोलिसांना प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल. अटकेनंतर ही माहिती राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना दिली जाईल. पोलिस त्यांना हिंदीत किंवा इंग्रजीत ही माहिती देतील. राणेंच्या वक्तव्यानंतर शिवसैनिक आक्रमक दिसत आहेत. नाशिकमधील भाजप कार्यालयावर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेकही केली.

राणेंविरोधात 4 एफआयआर दाखल
नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर रायगड, पुणे, नाशिक आणि जळगाव येथे त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. राणे यांच्या वक्तव्याबाबत नाशिकचे शिवसेना पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी नाशिकच्या महाड पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला होता. आपल्या तक्रारीत सुधाकर म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत आणि घटनात्मक पदावर आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेले वक्तव्य संपूर्ण राज्याचा अपमान आहे. सुधाकर यांच्या तक्रारीवरून नारायण राणे यांच्याविरोधात कलम 500, 502, 505 आणि 153 (A) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीत पुढे म्हटले आहे की, राणेंच्या वक्तव्यामुळे समाजात द्वेष निर्माण होऊ शकतो आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यानंतर नाशिक पोलिसांनी राणेंविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे.यानंतर युवा सेनेचे सचिव रोहित कदम यांनी पुण्यातील चतुश्रुगी पोलिस ठाण्यात IPC कलम 153, 153 B (1) (C), 505 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. असाच एक गुन्हा रायगडमध्येही नोंदवण्यात आला आहे.