पीएम किसान योजनेत लाभार्थ्यांनी ३१ ऑगस्ट पूर्वी ई-केवायसी करावी – जिल्हाधिकारी नयना गुंडे

0
64

अन्यथा लाभ मिळणार नाहीत

         गोंदिया, दि. २० : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पोर्टलवर नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ऑनलाईन ई-केवायसी (खात्याबद्दलची प्रमाणित माहिती) नोंदविण्यासाठी ३१ ऑगस्ट २०२२ ही शेवटची तारीख असून आपण लाभार्थी असल्याची खातरजमा व योग्य माहिती नोंदवण्यासाठी ही प्रक्रीया केली जाते. या योजनेतील लाभार्थ्यांनी ३१ ऑगस्ट पूर्वी ई-केवायसी पूर्ण करावी अन्यथा सदर योजनेअंतर्गत वितरित होणारा १२ वा हप्ता व यापुढील लाभाचे सर्व हप्ते वितरित केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी असे जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

       त्यानुषंगाने जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांना खात्यावर योग्य ग्राहक नोंदणी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी http://pmkisan.gov.on  या संकेतस्थळावरील फार्मर कॉर्नर या टॅब मध्ये किंवा पीएम किसान ॲपद्वारे ओटीपीद्वारे लाभार्थीना स्वत: ऑनलाईन केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल, तसेच ग्राहक सेवा केंद्रावर ऑनलाईन प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पध्दतीने करता येईल.

         पी.एम. किसान योजनेंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील कालावधीचा लाभ प्राप्त होण्यापूर्वी ऑनलाईन केवायसी प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असून 31 ऑगस्ट 2022 अखेरपर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांनी ती पूर्ण करावी, असे जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी कळविले आहे.