
पशुसंवर्धन विभागाचे आवाहन
गोंदिया, दि. 21 : राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देत त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणा-या विविध योजना व उपक्रम पशुसंवर्धन विभागातर्फे राबविण्यात येत असून या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पशुसंवर्धन विभागाने महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक, शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी कटीबध्द असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करणेसाठी राज्यस्तरीय नाविन्यपुर्ण योजनेमध्ये गेली चार वर्षे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरु करण्यात आली आहे. आता याबरोबर जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी सदर संगणक प्रणाली लागु करण्यात आली आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरीता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागु नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षा यादी सन 2021-22 पासून पुढील 5 वर्षापर्यंत म्हणजे सन 2025-26 लागू ठेवण्याची सोय केली आहे.
यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केंव्हा लाभ मिळेल हे कळु शकल्यामुळे हिस्सा भरणे किंवा इतर बाबीकरीता नियोजन करता येणे शक्य होणार आहे. त्यानुसार नाविन्यपुर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई-म्हशीचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप योजनांसाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2022-23 या वर्षात राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक, शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात येत आहे.
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ : https.//ah.mahabms.com हे असून अर्ज करण्याचा कालावधी 13 डिसेंबर 2022 ते 11 जानेवारी 2023 हा आहे. अँड्राईड मोबाईलवरील AH.MAHABMS या अप्लिकेशनवर सुद्धा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. टोल फ्री क्रमांक 1962 किंवा 1800-233-0418 यावरही संपर्क साधला जाऊ शकतो. योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पध्दती याबाबतचा संपूर्ण तपशील संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. या संगणकप्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून, अर्जामधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यमुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरीता स्वतःचे मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये व मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फी क्रमांक 1962 किंवा 1800-233-0418 किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा उपआयुक्त कार्यालय, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रवर संपर्क साधावा, असे आवाहन रुपेश (सोनु) रमेश कुथे, सभापती, कृषी व पशुसंवर्धन आणि डॉ. कांतीलाल पटले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद, गोंदिया यांनी केले आहे.