41.3 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home विदर्भ अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना प्रेरित करा- जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना प्रेरित करा- जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे

0
30

blank

– ‘योजनांची जत्रा’ चा आढावा
 दुर्गम भागावर लक्ष केंद्रित करा

     गोंदिया, दि.२६  : गरजू व गरीब व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी शासनाने “योजनांची जत्रा” हा उपक्रम हाती घेतला आहे. राज्य शासन सामान्य जनतेसाठी विविध लोकोपयोगी योजना राबवीत आहे.  सामान्य जनतेला शासकीय योजनांची माहिती, अर्ज केल्यावर लाभ कसा मिळतो, कुठे अर्ज करावा, कागदपत्रे काय जोडावीत याची माहिती नसते. यामुळे काहीजण शासकीय योजनांपासून वंचित राहतात. आपल्याला कोणत्या शासकीय योजनेचा लाभ मिळेल हे ही अनेकांना माहिती नसते. या जत्रेच्या निमित्ताने नागरिकांना अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी संबंधित विभागाने प्रेरित करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केल्या. ‘योजनांची जत्रा’ हा कार्यक्रम जिल्हा प्रशासनातर्फे लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.

         जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपविभागीय अधिकारी अनमोल सागर, पर्वणी पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अंबरीश मोहबे, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार व विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

        योजनांची माहिती, त्यासाठी लागणारे कागदपत्रे, अर्जाचा नमुना, अर्ज स्वीकारण्याची पध्दत ऑनलाईन की ऑफलाईन, योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता व कालावधी यासंबंधी नागरिकांमध्ये जाणिव जागृती करावी. कुठलाही अर्ज प्रलंबित न ठेवता लाभार्थ्यांकडून कागदपत्रांची पूर्तता करून तो निकाली काढावा व त्याचे वितरण योजनांची जत्रा कार्यक्रमात करावे. जिल्ह्यातील दुर्गम व अति दुर्गम भागातील नागरिकांना जास्तीत जास्त योजनांचा लाभ देण्यासाठी नियोजन करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

         या कार्यक्रमात लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, दाखले, मतदान कार्ड, जात प्रमाणपत्र, पट्टे, आरोग्य कार्ड, स्वाईल कार्ड, महिलांना सखी किट, दिव्यांगाना साहित्य वाटप, आधार कार्ड, कर्ज प्रकरण, रेशनकार्ड, चष्मे वाटप करण्यात यावे असे त्यांनी सांगितले. प्रत्येक विभागाच्या विविध योजनांचा असंख्य लाभार्थ्यांना लाभ देण्याचे नियोजन प्रत्येक विभागाने करणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. या सोबतच रक्तदान व आरोग्य शिबिर, कृषी प्रदर्शन, रोजगार मेळावा, कर्ज वितरण मेळावा, अवयव दान अर्ज भरून घेणे आदी मेळावे याच कार्यक्रमात आयोजित करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची असणार आहे. प्रत्येक विभागाने त्यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व नियोजन याबाबतची माहिती तत्काळ जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

         लाभार्थ्यांना जलद, कमी कागदपत्रामध्ये आणि शासकीय निर्धारित शुल्कात योजनेचा लाभ देण्यात येणार असून या उपक्रमात सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी एकाच छताखाली एकाच ठिकाणी येऊन गरजूंना शासकीय योजनेचा लाभ देणार आहेत. यामध्ये योजनांचा लाभ मिळवून देणे, आवश्यक कागदपत्रे प्रमाणित करणे, योजनांची माहिती देणे हा मूळ उद्देश या जत्रेचा आहे. जत्रेत एकाच योजनेचा लाभ मिळणार नसून यामध्ये त्या कुटुंबाला अन्य योजनांचीही माहिती होणार आहे. यामुळे विविध योजनांचा लाभ एकाच गरीब कुटुंबाला झाल्यास ते कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वर यायला हातभार लागणार आहे.

          नागरिकांनी अर्ज करावे : शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी संबंधित विभागाकडे तात्काळ अर्ज सादर करावा. अर्जासोबत सर्व कागदपत्रे सादर करावी. योजना व अर्ज कसा भरावा यासाठी संबंधित विभाग नागरिकांना सहकार्य करेल. पात्र लाभार्थ्यांना ‘योजनांची जत्रा’ या कार्यक्रमात लाभ देण्यात येईल. जास्तीत जास्त नागरिकांनी शासनाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे असे आवाहन जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील व जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे.