Home विदर्भ भंडारा जिल्ह्यातील ८२२२ नवसाक्षर उत्तीर्ण

भंडारा जिल्ह्यातील ८२२२ नवसाक्षर उत्तीर्ण

0

नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत चाचणी परीक्षेचा निकाल जाहीर

भंडारा, दि. 9 : उल्लास – नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यातील नोंदणीकृत ८८२० पैकी ८२२२ नवसाक्षर परीक्षेत उत्तीर्ण झाले असून या परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी निरक्षरतेचा कलंक पुसून टाकला आहे.

भंडारा जिल्ह्यासाठी राज्य स्तरावरून सन – २०२२-२३ व सन – २०२३-२४ साठी ९१६९ असाक्षर नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ८८२० नवसाक्षरांची उल्लास अॅपवर नोंदणी करण्यात आली. दिनांक – १७ मार्च २०२४ रोजी भंडारा जिल्ह्यातील ७५५ परीक्षा केंद्रांवर पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून ८८२० नोंदणीकृत असाक्षरांपैकी ५६६ असाक्षर परीक्षेस गैरहजर होते. तर ८२२२ (९३.२२%)  नवसाक्षर उत्तीर्ण झाले आहेत. त्यात २८७२ पुरुष व ५३५० महिलांचा समावेश आहे.

सदर परीक्षेसाठी १५ ते ३५ वयोगटातील ११४०, ३६ ते ६५ वयोगटातील ५६०८ व ६६ वर्षांवरील १५०६ नवसाक्षरांचा समावेश होता. जात प्रवर्ग निहाय अनुसूचित जातीचे ९४४, अनुसूचित जमातीचे ९६०, इतर मागासवर्गीय ६२२३, अल्पसंख्याक ४८ व सर्वसाधारण प्रवर्गातील ७९ नवसाक्षर परीक्षेत सहभागी झाले होते.

तथापि, ३२ नवसाक्षरांना या परीक्षेत  ‘ सुधारणा आवश्यक ‘ असा शेरा मिळाल्याने त्यांना आगामी सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या फेरपरीक्षेत पुन्हा संधी दिली जाणार आहे.

सदरील परीक्षेचा निकाल केंद्र शासनाच्या राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्था (NIOS) नवी दिल्लीच्या www.NIOS.ac.in व https://results.nios.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

असा आहे जिल्ह्याचा निकाल..

तालुका  प्रविष्ट   उत्तीर्ण     सुधारणा आवश्यक

१) भंडारा  १६७७  १६५९  १८

२) मोहाडी ११४६  ११४६  ००

३) तुमसर  १५१३  १५१३  ००

४) साकोली  ८७१    ८७१  ००

५) लाखनी १००६  १००४  ०२

६) लाखांदूर  ९५०    ९५०  ००

७) पवनी    १०९१  १०७९  १२

——————————

    एकूण –  ८२५४  ८२२२  ३२

भंडारा जिल्ह्यात मा. महेश पालकर साहेब, शिक्षण संचालक (योजना) यांच्या प्रेरणेने तसेच जिल्हाधिकारी मा. योगेश कुंभेजकर साहेब व मुख्य कार्यकारी अधिकारी मा. समीर कुर्तकोटी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मा. प्राचार्य, डाएट भंडारा, उपशिक्षणाधिकारी, सर्व गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, साधन व्यक्ती तसेच विविध शिक्षक संघटना पदाधिकारी यांच्या सहकार्याने नवभारत साक्षरता कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.

            या कामी सर्व मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, स्वयंसेवक (VTs) आणि शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी यांनी मोलाची भूमिका बजावली. आगामी शैक्षणिक वर्षात सर्वांच्या सहकार्यातून भंडारा जिल्ह्यात नवसाक्षरांसाठी डिजिटल, आर्थिक साक्षरतेच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्याचा मानस आहे.

Exit mobile version