32.8 C
Gondiā
Tuesday, June 16, 2026
Home विदर्भ ‘त्या’ बालकांच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय एस.टी.आयोगाकडून दखल

‘त्या’ बालकांच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय एस.टी.आयोगाकडून दखल

0
119

गडचिरोली : सप्टेंबर 2024  मध्ये अहेरी तालुक्यात दोन छोट्या भावंडांचा वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने अर्ध्या तासाच्या फरकाने संशयास्पद मृत्यू झाला होता. चांगल्या रस्त्याअभावी त्या मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन आई-वडीलांनी पायी 15 किलोमीटरवर चालत घर गाठले होते. याप्रकरणी आझाद समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाकडे तक्रार केल्यानंतर आयोगाने त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस पाठवून या प्रकरणी स्पष्टीकरण मागितले आहे.

बाजीराव रमेश वेलादी (6 वर्ष) आणि दिनेश रमेश वेलादी (3 वर्ष) अशी मृत भावंडांची नावं आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यानेच त्या भावंडांना आई-वडीलांनी चिखल तुडवत पायी नेल्याचा आरोप त्यावेळी झाला होता. दरम्यान आरोग्य विभागाने मात्र रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याच्या आधीच आई-वडीलांनी त्या मुलांचे मृतदेह नेल्याचे स्पष्ट केले होते. हे प्रकरण विधीमंडळापर्यंत गाजले होते.

दरम्यान प्रशासनाकडून या घटनेनंतर कुठलीही ठोस पाऊले न उचलल्याने आणि पीडित कुटुंबाला न्याय न देता त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्याने आझाद समाज पक्षाचे गडचिरोलीचे पदाधिकारी धर्मानंद मेश्राम, राज बन्सोड आणि विनोद मडावी यांनी थेट राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग, दिल्ली यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्या तक्रारीची दखल घेत आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस पाठवून 15 दिवसात प्रशासनाची बाजू लेखी स्वरूपात मांडण्यास सांगितले आहे. या कालावधीत उत्तर न मिळाल्यास दिवाणी न्यायालयाचे अधिकार वापरून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे देखील नोटीसमध्ये नमूद आहे.

तक्रारीत उपस्थित केलेले मुद्दे

1.गडचिरोली जिल्ह्यात आरोग्याच्या पायाभूत सुविधा आणि तज्ज्ञांची मोठी कमतरता आहे.
2.अनेक डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त असल्यामुळे गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेचा मोठा अभाव निर्माण झाला आहे.
3.माडिया आदिवासीसाठी ‘विशेष आरोग्य केंद्रे’ स्थापन करण्याची तरतूद आहे. मात्र, या तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यात अद्याप कोणतेही आरोग्य केंद्र स्थापन झालेले नाही.
4.पारंपरिक वैद्य (पुजारी) यांना औपचारिक आरोग्य व्यवस्थेत कधीच समाविष्ट करण्यात आले नाही किंवा आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान व पद्धतींबाबत त्यांना शिक्षण देण्यात आले नाही. या शिक्षण व समन्वयाच्या अभावामुळे टाळता येण्यासारख्या अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत.

काय आहेत मागण्या?

1.पीडित परिवाराला नुकसानभरपाई द्यावी.
2.रुग्णालयातील रिक्त जागा भराव्यात. प्राथमिक आरोग्य केंद्रांची निर्मिती करावी आणि रुग्णवाहिका पुरेशा प्रमाणात उपलब्ध कराव्यात.
3.पारंपरिक वैद्य (पुजारी) यांचे गुन्हेगारीकरण न करता त्यांना आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान व पद्धतींबाबत शिक्षण देण्यात यावे.
4.दुर्गम भागात रुग्णांना अत्यावशक आरोग्य सेवा देण्यासाठी एअरलिफ्ट म्हणजेच हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात यावी.
5.आदिवासी समाजाच्या आरोग्याच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी विशेष समितीचे गठन करावे.
6.आयोगाने प्रत्यक्ष गडचिरोलीला भेट देऊन आरोग्यविषयक प्रश्न समजून घ्यावे.