
गोंदिया दि. 29: आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व तयारीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला आवश्यक त्या सूचना देऊन मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभा कक्षामध्ये आयोजित बैठकीला जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, अप्पर तहसिलदार श्रीकांत कांबळे तहसीलदार समशेर पठाण, तहसिलदार मोनिका कांबळे, तहसीलदार प्रज्ञा भाकरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांची उपस्थिती होती.
आपत्ती व्यवस्थापन कार्यकाळामध्ये जिल्हा नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवावा, जेणेकरून कोणतीही आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रतिसाद देता येईल. बैठकीत आपत्ती व्यवस्थापनासाठी वापरली जाणारी साधने आणि यंत्रणा अद्ययावत ठेवण्यावर भर देण्यात यावा. विशेषतः बोट, लाईफ जॅकेट्स, जीपीएस यंत्रणा, सॅटेलाईट फोन, रिमोट कंट्रोल बोट यांची तपासणी करून त्यांची कार्यक्षमता सुनिश्चित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
श्री. नायर यांनी सांगितले की, “आपत्ती कोणतीही पूर्वसूचना न देता येते. म्हणूनच आपण सज्ज राहणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाने यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करावे. तहसिलदार, तलाठी व इतर प्रशासन यंत्रणांनी परस्पर समन्वयाने कार्य करण्याचे आदेश दिले, जेणेकरून गावपातळीवरही बचावकार्य आणि मदत जलद गतीने पोहोचेल.
संबंधीत यंत्रणांनी धोकादायक ठरू शकणाऱ्या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा. गोंदिया जिल्ह्यातील 96 गावे ही पूर प्रणव क्षेत्रामध्ये येतात यामुळे या ठिकाणी असणारे पूल, धरण, नाले यावर दिशादर्शक फलक लावण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या.
बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रतिनिधी, पोलीस, आरोग्य विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.