
मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांचा ग्रामपंचायतीना इशारा
गोंदिया,दि.३०ः पावसाळ्यात दूषित पाणी वाहून आल्याने ग्रामीण भागात साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो.त्यामुळे पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण आवश्यक आहे.त्याकरिता ग्रामपंचायतींनी जलजन्य साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी उपाययोजना कराव्यात.तसेच यात हयगय केल्यास कार्यवाही केली जाईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी दिले आहेत.
जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात दि.28 मे रोजी जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता व सर्वेक्षण अंतर्गत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते.बैठकीला पाणी व स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक फरेन्द्र कुतीरकर, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर वासनिक, कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सुमित बेलपत्रे, उप विभाग यांत्रिकीचे मोर,आरोग्य विभागाचे साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल, जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेच्या रसायणी भाग्यश्री सोनी, भूजल सर्वेक्षण विभागाचे इगळे यांचेसह जिल्हा कक्षातील सर्व सल्लागार आणि दूरस्थ प्रणालीद्वारे सर्व गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी आरोग्य, बीआरसी उपस्थित होते.
यंदा पावसाळ्यात साथरोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी यांना मुख्य कार्यकारी अधिकारी एम.मुरुगानंथम यांनी साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत.दूषित पाण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत ग्रामस्थांमध्ये नियमितपणे जागृती घडवावी.संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्या साप्ताहिक बैठका घेऊन कामाचा आढावा घ्यावा, नागरिकांना निर्जंतुक व सुरक्षित पाणीपुरवठा करण्यात कसूर करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी. गेल्या पाच वर्षातील जलजन्य व कीटकजन्य रोगांची लागण व मृत्यू याचा आढावा घेऊन ज्या गावात मृत्यूची संख्या मोठी असेल तेथे विशेष लक्ष द्यावे.त्या गावांना जोखीमग्रस्त गाव म्हणून घोषित करावे.तसेच अशा गावांची यादी तयार करुन त्या गावांवर विशेष देखरेख करण्याच्या सुचना दिल्यात.
दुषित जलस्रोत, जुनाट आणि गंजलेले नळ व गटाराखालून जाणाऱ्या जलवाहिन्या याची तपासणी कराव्यात.गळती रोखून जलवाहिन्या गटारीतून अथवा गलिच्छ पाण्यातून जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.ज्या गावात ब्लिचिंग पावडरचा साठा नाही अथवा कमी आहे.तेथे त्याचा तत्काळ पुरवठा करावा. एकूणच शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याच्या सूचना दिल्या आहेत
जलजन्य व कीटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव आहेत त्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना कराव्यात.ग्रामस्थांना शुद्ध व निर्जंतुक पाणीपुरवठा वेळेवर उपलब्ध करून देण्याबाबत सतर्क आणि जागरूक राहण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
ग्रामपंचायतींसह पंचायत, आरोग्य, पाणीपुरवठा विभागास सूचना-
- नियमित शुद्धीकरण प्रक्रिया करून पाणीपुरवठा करावा.
- जलस्रोत, जलवाहिन्यांचा परिसर स्वच्छ ठेवावा.
- पाणीपुरवठा यंत्रणांची वेळेवर व सुयोग्य देखभाल करावी.
- डास-माशांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी स्वच्छता राखावी.
- ३३ टक्के क्लोरीनचे ब्लिचिंग पावडर, सोडिअम हायपोक्लोराईड, तुरटी यांचा तीन महिने पुरेल इतकासाठा उपलब्ध असावा.
- पाण्याचे नमुने घ्यावेत. त्यानुसार आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात.
- आठवड्यातुन एक दिवस कोरडा दिवस पाळण्याबाबत गावोगावी जनजागृती करावी.
- गावपातळीवर ग्रामपंचायती मार्फत घरांना व्हेंट पाईपला जाळी बसविण्यात यावी.
- पाणी गुणवत्ता संनियंत्रणातील त्रुटी दूर करण्यासाठी माहिती उपलब्ध करून द्यावी.
- सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी ग्रामपंचायतीने उपाययोजना कराव्यात.