
नागपूर, 2 जून 2025: महाराष्ट्राला वीज अपघातांपासून मुक्त करण्याच्या ध्येयाने, महावितरणने आपला 20 वा वर्धापन दिन ‘शून्य अपघात महावितरण… शून्य अपघात महाराष्ट्र…’ या संकल्पनेसह ‘विद्युत सुरक्षा सप्ताह’ म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे. येत्या 6 जून रोजी महावितरणच्या स्थापनेला दोन दशके पूर्ण होत असल्याने, 1 ते 6 जून 2025 या काळात हा विशेष सप्ताह राज्यभर राबवला जात आहे. या अंतर्गत, सोमवारपासून नागपूर परिमंडळातील सर्व उपविभागांनी रहिवासी भाग, बाजारपेठा, सार्वजनिक वाहतूक केंद्रे आणि गर्दीच्या ठिकाणी वीज सुरक्षेविषयी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.
महावितरणने गेल्या काही वर्षांत कर्मचाऱ्यांचे अपघात कमी करण्यात महत्त्वपूर्ण यश मिळवले असले, तरी नागरिक आणि लहान मुलांचे विजेमुळे होणारे अपघात चिंताजनक ठरले आहेत. याच पार्श्वभूमीवर, समाजात विद्युत सुरक्षेविषयी जाणीव निर्माण करून अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे नागरिकांना विजेच्या वापराबाबत अधिक जबाबदार बनण्यास मदत होणार आहे, अशी महावितरणला अपेक्षा आहे.
वर्धापन दिन आणि विद्युत सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून, महावितरणने आपल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या सप्ताहाविषयी माहिती देण्यासाठी एसएमएस पाठवण्यास सुरुवात केली आहे. याव्यतिरिक्त, वीज ग्राहकांना विद्युत सुरक्षेविषयी महत्त्वपूर्ण माहिती ईमेलद्वारे पाठवली जात आहे, जेणेकरून अधिक लोकांपर्यंत हा संदेश पोहोचेल.
या सप्ताहाची सुरुवात रविवारी ‘रन फॉर सेफ्टी’ मॅरेथॉनने करण्यात आली, ज्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले. एमआयडीसी उपविभागातील वाडी परिसरातील स्वप्नील एन्क्लेव्ह या निवासी संकुलात अतिरिक्त कार्यकारी अभियंता पराग फाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जनजागृती मेळावा आयोजित केला. यात 48 नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला. सोमवारी, हिंगणा उपविभागातील वानाडोंगरी येथील शालिनीताई मेघे हॉस्पिटल आणि गांधीबागेतील मे. रचलदास यांच्या डिजिटल स्क्रीनवर विद्युत सुरक्षेवरील माहितीपटाचे प्रसारण करून नागरिकांना या विषयाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
याशिवाय, त्रिमुर्तीनगर येथील राजीव गांधी उद्यान, मदन रतन सिटी, जानकी नगर, खापा बस स्थानक, वीज बिल भरणा केंद्र, एलएडी महाविद्यालय, एलएडी चौक, ब्राह्मणी ग्रामपंचायत, खापा नगर परिषद येथेही जनजागृती मेळावे घेऊन उपस्थितांना माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. नवीन मंगळवारी येथील उन्हाळी शिबिरात 50 विद्यार्थ्यांनी, तर बिनाकी येथे 100 विद्यार्थ्यांनी विद्युत सुरक्षा मेळाव्याचा लाभ घेतला. नरखेड, गोरेवाडा, अनंतनगर, जाफरनगर, काटोल रोड, महानगरपालिका झोन कार्यालय मंगळवारी बाजार, आयटीआय काटोल, कुही, भिवापूर, इंजिनियर्स गॅरेज वानाडोंगरी, कोंढाळी बस स्थानक, आयटीआय कळमेश्वर, केळवद, लावा ग्रामपंचायत, उमरेड बस स्थानक, कामठी उपविभाग यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी महावितरणतर्फे विद्युत सुरक्षेचा जागर सुरू आहे.
नागपूर जिल्ह्याप्रमाणेच वर्धा जिल्ह्यातही महावितरणतर्फे विद्युत सुरक्षेविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. वर्धा येथील ऑक्सिजन पार्क, हिंगणघाट बस स्थानक, सेलू बस स्थानक, हिंगणघाट तहसील कार्यालय, पिपरी ग्रामपंचायत, नालवाडी आधार केंद्र, पिपरी मेघे येथील अभ्यासिका, जेईई वर्ग कारंजा, हिंगणघाट बाजार समिती, देवळी बस स्थानक, आयटीआय पुलगाव, आयटीआय आष्टी, श्री संत भोजाजी महाराज देवस्थान, आजनसरा, पोहणा वीज वितरण केंद्र, मंडळ अधिकारी कार्यालय, खरांगणा आणि तलाठी कार्यालय, खरांगणा परिसरात विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांना सर्वसामान्य नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी सर्व वीज ग्राहकांना आवाहन केले आहे की, विद्युत सुरक्षा ही एक सामूहिक जबाबदारी आहे. प्रत्येक नागरिकाने याबाबत जागरूक राहून नियमांचे पालन केल्यास विजेमुळे होणारे अपघात टाळता येतील आणि सुरक्षित समाज निर्माण होईल. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन कामात वीज सुरक्षेला महत्त्व देणे अत्यंत आवश्यक आहे.