
सालेकसाः नगर पंचायत येथे शासन निर्णयानुसार नियमाप्रमाणे ठरवलेला आकृतीबंध प्रमाणे पद भरती करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगर परिषद प्रशासन नागपूर यांना तहसीलदार नरसय्या कोंडागुरले यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
सालेकसा नगर पंचायत स्थापनेच्या वेळी नगर पंचायतची लोकसंख्या ३६९० एवढी होता. त्याप्रमाणे एकूण १८ पदसंख्या निश्चित करण्यात आली होती. आणि त्या नंतर आमगाव खुर्द ही मोठी ग्रामपंचायत सालेकसा नगर पंचायत मध्ये समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे लोकसंख्या ८८८७ इतकी झाली आहे. सदर लोकसंख्या बघता नागरिकांना योग्य सोई सुविधा मिळावे म्हणून शासनाने आकृतीबंध तयार करून कर्मचारी भरतीचा निर्णय घेतला आहे. परंतु, अद्यापही आकृतीबंध प्रमाणे पद भरती झालेली नाही. यामुळे विकासकामांवर परिणाम होवून नागरिकांना विविध सेवांपासून वंचित रहावे लागत आहे. शिवाय अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे कामे प्रभावित होत आहे. याची दखल घेवून आकृतीबंध प्रमाणे पद भरती करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन तहसीलदार नरसय्या कोंडागुरले यांच्या मार्फत विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपरिषद प्रशासन नागपूर यांना देण्यात आले. निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. अजय उमाटे, शहर अध्यक्ष ब्रजभूषण बैस, डॉ. हिरालाल साठवणे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष बाजीराव तरोने, महिला तालुका अध्यक्ष गीता चौधरी, दुर्गा पटले, योगराज पटले, किसनलाल रहांगडाले, जितेंद्र बडोल, बबलू मानकर, अरुण तावाडे, सोनू दसरिया उपस्थित होते.