
ग्रामपातळीवर उत्स्फूर्त सहभाग आणि प्रतिसाद
वाशिम,दि.१५ जून:भूजल पातळीतील घटती स्थिती ही मोठी चिंतेची बाब ठरत असताना,भूजल पातळी सातत्याने खालावत असलेल्या पार्श्वभूमीवर शाश्वत जलव्यवस्थापनासाठी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांचा जलतारा हा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पुढे आला आहे.याअनुषंगाने ‘वत्सगुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धा २०२५’ हा एक दूरदृष्टीपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामपातळीवर लोकसहभाग वाढवून जलसंधारण, पाणलोट क्षेत्र विकास, आणि भूजल पुनर्भरण यासारख्या महत्त्वाच्या बाबींमध्ये प्रभावी बदल घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.पाणी अडवा – पाणी जिरवा या तत्त्वावर आधारित असलेल्या या स्पर्धेने गावकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण केली असून, वाशिम जिल्हा संपूर्ण राज्यासाठी जलसंवर्धनाचा आदर्श ठरत आहे.
भूजल संवर्धनासाठी जिल्हा प्रशासनाने वत्सगुल्म भूजल पुनर्भरण २०२५ ही स्पर्धा जाहीर केली होती. त्याअंतर्गत स्पर्धेच्या परिक्षणासाठी वाशिम जिल्ह्यातील सहा तालुक्यातील २४ गावे पात्र ठरली होती. या गावांचे पात्रतेनुसार परीक्षण दि. १४ जून २०२५ रोजी शनिवारच्या दिवशी प्रत्यक्ष ग्रामपातळीवर पार पडले.
या परीक्षणासाठी प्रकल्प संचालक आत्मा, अकोला येथील डॉ. मुरली इंगळे यांच्या नेतृत्वाखाली ५५ तज्ज्ञांचे ११ पथक तयार करण्यात आले होते. या पथकांनी गावांना भेटी देऊन जलतारा कामांची पाहणी करण्यात आली. परीक्षण कार्यामध्ये तिफन फाउंडेशनने परिक्षणाची संपूर्ण जबाबदारी पार पाडली.पथकाचे स्वागत उपविभागीय अधिकारी कैलास देवरे आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक अध्यक्ष डॉ. हरिष बाहेती,सुभाष नानोटे (जलमित्र) यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या वेळी उपविभागीय कृषी अधिकारी, सर्व तालुका कृषी अधिकारी तसेच सर्व गावांचे सरपंच, उपसरपंच, वॉटर हिरो, गावकरी, संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ही पाहणी प्रक्रिया ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे अधिक प्रभावी ठरली असून, वाशिम जिल्हा जलसंधारणाच्या दिशेने सकारात्मक पावले उचलत आहे.
परिक्षणाचे पथक प्रमुख विजय सरोदे मेहकर,श्रीनिवास शिंदे वसमत,के एम जाधव नांदेड,विठ्ठल धांडे मेहकर, विनोद सुसर, बुलडाणा,धनंजय वार्डेकर नाशिक, आनंद बथकल आर्णी, रवींद्र जटाळे नेर,विलास वाशीमकर अकोला, अनंत देशमुख अकोट, मिलिंद वानखेडे अमरावती यांनी कामकाज पाहिले. तर संपर्क अधिकारी म्हणून आर के राठोड, गंगाधर इंगोले,महादेव सोळंके,जगन शिंदे,प्रकाश कायंदे,रमेश जाधव,रवींद्र सवणे,रवींद्र मापारी,कैलास महाले,पंजाब जाधव,गुणवंत ढोकणे यांनी जबाबदारी सांभाळली.