वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी जनावरांच्या संदर्भात मांडला औचित्याचा मुद्दा..

0
22

बुलढाणा : हिंस्त्र वनप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्या पाळीव जनावरांना बिल्ला नसलातर वनविभाग त्यांना नुकसान भरपाई देत नाही, हा प्रकार पूर्णतः अन्यायकारक असल्याचे आ. संजय गायकवाड यांनी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित करताना सांगून ही अट रद्द करण्याची मागणी करतानाच शासकीय गुरांचे दवाखाने आणि ग्रामीण पशुवैद्यकीय केंद्रांमध्ये आकारली जाणारी १० रुपयांची फी रद्द करण्याचीही ठाम मागणी त्यांनी यावेळी केली.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सुरू झाले असून, आज बुधवार २ जुलै रोजी विधानसभेत आ. संजय गायकवाड यांच्या माध्यमातून बुलढाण्याचा एकच आवाज गुंजला.. हा आवाज त्यांनी उठवला मुक्या पाळीव प्राण्यांसाठी. सभागृहात आपला आवाज बुलंद करताना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्या जनावरांच्या नुकसान भरपाईबाबत धर्मवीर आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले.

२०२४ पासून बुलढाणा जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांची जनावरे हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात दगावली आहेत,पण ज्या जनावरांच्या कानाला बिल्ला (टॅग) नाही, अशा जनावरांच्या मृत्यूवर वनविभाग नुकसान भरपाई देत नाही हे अन्यायकारक आहे, असे यावेळी सांगितले. याच संदर्भाने, आ. संजुभाऊ गायकवाड  यांनी १५ एप्रिल २०२४ रोजी संबंधित वनमंत्र्यांना लेखी निवेदन दिले असून, आज पुन्हा याच मुद्द्यावर सभागृहात ठामपणे त्यांनी मागणी उपस्थित केली की, बिल्ला (टॅग)नसल्यामुळे नुकसान भरपाई न देण्याची अट रद्द करण्यात यावी,जेणेकरून शेतकऱ्यांना मदत मिळू शकेल आणि त्यांच्या पशुधनाचे संरक्षण होईल.

यासोबतच, शासकीय गुरांचे दवाखाने आणि ग्रामीण पशुवैद्यकीय केंद्रांमध्ये आकारली जाणारी १० रुपयांची फी रद्द करण्याचीही ठाम मागणी यावेळी केली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निशुल्क पशुवैद्यकीय सेवा मिळायला हवी. हेच खरे कृषी आणि पशुधन सशक्तीकरण असे यावेळी सांगितले. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, शेती आणि पशुधन रक्षणासाठी, मी आजही आवाज उठवतो आहे, आणि यापुढेही उठवत राहीन.. असे आ. गायकवाड यांनी सांगितले.