
भंडारा : भंडारा जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दिवसभर पावसाची रिपरिप सुरु आहे. कुठे दमदार तर कुठे रिपरिप पाऊस सातत्याने कोसळत आहे. तसेच गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार दमदार व जिल्ह्यालगतच्या प्रदेशात अतिवृष्टी होत असल्याने गोसेखुर्द धरणाच्या ३३ द्वारांपैकी १३ वक्रद्वारे दि. ३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी उघडण्यात आली. यामुळे काही प्रमाणात वैनगंगानदीच्या पात्रात पाणी वाढल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा ईशारा दिला आहे.
या वर्षीच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच गोसेखुर्द धरणाची १३ वक्रद्वारे अर्ध्या मिटरने उघडण्यात आली असून १३८५ क्युमेकस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. याशिवाय धापेवाडा धरणाची ७ द्वारे उघडली असून ८९०.९ क्युमेकस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वैनगंगा नदीची कारधा येथील धोक्याची पातळी २४५.५० मी असून सध्या पाण्याची पातळी ईशारा पातळीच्या खाली आहे. (Gosekhurd Dam) गोसेखुर्द धरणाची १३ वक्रद्वारे उघडल्यामुळे वैनगंगा नदी दुथळी भरून वाहत आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा ईशारा प्रशासनाने दिला आहे.
दरम्यान,गोसेखुर्द धरणातून वैनगंगा नदीपात्रामध्ये पूर नियंत्रण करिता दि.३ जुलै रोजी सायंकाळी ६.४५ वाजता १३ वक्रद्वारे खुली करून अंदाजे १३८५ क्यूमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. दोन्ही जलविद्युत प्रकल्पांचा २०८ क्युमेक्स पाण्याचा विसर्ग पकडून एकूण अंदाजे १५९३ क्युमेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी पात्रात आवागमन करणार्यांनी तसेच नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे.