गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा: धान खरेदीचे उद्दिष्ट २० लाख क्विंटलने वाढवले

0
1383

आता २० जुलै पर्यंत होणार धान खरेदी!!

आमदार राजकुमार बडोले,विनोद अग्रवाल,विजय रहागंडाले व परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्याकडे केली होती मागणी

गोंदिया दि. ७ जुलै २०२५: गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उद्दिष्टा अभावी रखडलेल्या धान खरेदीच्या समस्यांकडे लक्ष वेधणाऱ्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार आणि माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले तसेच आमदार विजय रहागंडाले,विनोद अग्रवाल,परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदनातून केलेल्या मागणीला यश आले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशन २०२५ मध्ये आमदार बडोले यांनी उपस्थित केलेल्या औचित्याच्या मुद्द्याला व इतर आमदारांच्या निवेदनाला प्रतिसाद देत राज्य सरकारने धान खरेदीचे उद्दिष्ट २० लाख क्विंटलने वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सोबतच धान खरेदी तातडीने सुरू करण्यात यावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. हो खरेदी २० जुलै २०२५ पर्यंत सुरू राहील.

आ. बडोले यांनी २ जुलै २०२५ रोजी विधानसभेत गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या होत्या. यावर्षी उन्हाळी धानाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले असताना खरेदी प्रक्रिया अर्धवट थांबवल्याने शेतकऱ्यांचे धान शिल्लक राहिले होते. यामुळे धान खराब होण्याची भीती आणि आर्थिक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत होता. त्यांनी धान खरेदीची मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती. https://www.berartimes.com/vidarbha/212381/ धान खरेदीचे उद्दिष्ट वाढवून तत्काळ चुकारे द्या – आमदार विजय रहांगडाले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शेतकऱ्यांना आशेचा किरण
गोंदिया आणि भंडारा हे धान उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हे असून, येथील शेतकऱ्यांचे उत्पन्न प्रामुख्याने धान पिकावर अवलंबून आहे. धान खरेदीची मर्यादा वाढवण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. “हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. यामुळे पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांना स्थैर्य मिळेल,” असे आ. बडोले यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल गोंदिया जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकऱ्यांनी सरकार आणि आमदार विनोद अग्रवाल यांचे आभार मानले आहेत.