
वाशिम,दि.13 ऑगस्ट-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली यांच्या नालसा व संवाद योजनेअंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधिज्ञ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम जनुना (सोनवळ), ता. वाशिम येथे दि. ९ ऑगस्ट २०२५ रोजी कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या राज्य गीताने झाली. अध्यक्षस्थानी एस. व्ही. हांडे, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण हे उपस्थित होते.
या प्रसंगी व्ही. जी. चौखंडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांनी संवाद योजनेविषयी मार्गदर्शन केले. अॅड. वैभव तिफणे, उपाध्यक्ष, वकिल संघ, यांनी “मध्यस्थी व नागरिकांची कर्तव्ये” या विषयावर भाष्य केले. आदिवासी प्रकल्प अधिकारी यांनी “आदिवासींच्या योजना”, तर नप्ते , निवासी नायब तहसीलदार यांनी “महसूल योजना” या विषयांवर माहिती दिली.कार्यक्रमास ग्राम उपसरपंच रेखाताई राठोड, अॅड. भालेराव, श्री .काटकर (मुख्याध्यापक, जि. प. शाळा), पांडुरंग मापारी (मंडळ अध्यक्ष) यांची उपस्थिती होती.
सुत्रसंचालन व आभार अॅड. परमेश्वर आ. शेळके, मुख्य न्यायरक्षक यांनी केले. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.




