
नागपूर,दि.10ः- औरंगाबाद महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नामांतराचा मुद्दा चर्चेत आला आहे. नामांतराच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारमधून दोन भूमिका समोर आल्यामुळे हा वाद अधिकच वाढण्याची चिन्हे आहेत. यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल यांनी नामांतराच्या मुद्द्यावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यास काँग्रेसने ठाम विरोध केला आहे. तर, शिवसेनेने नामांतराच्या हालचालीही सुरु केल्याचे बोलले जातं आहे. त्यामुळे आघाडीत दोन गट पडले असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चांवर राष्ट्रवादीचे नेते प्रफु्ल्ल पटेल यांनीही भाष्य केलं आहे. ‘शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांच्या समन्वय समितीत निर्णय झाल्याशिवाय औरंगाबाद नामांतराचा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार नाही. औरंगाबादचे नामांतर ही शिवसेनेची भूमिका आहे सरकारची नाही,’ प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. ‘समन्वय समितीत नामांतराच्या विषयावर एकमत झाल्याशिवाय हा विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत येणार नाही. समन्वय समितीत चर्चा होऊन या वादावर तोडगा काढण्यात येईल. शिवसेनेचे नेते औरंगाबादला संभाजीनगर म्हणत असले तरी ती भूमिका सरकारची नाही,’ असेही पटेल यांनी म्हटलं आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही नामांतराचा प्रस्ताव आमच्या अजेंडामध्ये नाहीये. नावं बदलून शहरांचा विकास होतो असं आम्ही मानत नाही, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली होती.




