अमरावती येथे महिला व बालविकास भवनाचे भूमीपूजन

0
25

अमरावती, दि. 28 : महिला व बालविकास योजना राबविणारी सगळी कार्यालये एकाच छताखाली येण्यासाठी भवनाची निर्मिती करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांसाठी महत्त्वाची सुविधा निर्माण होणार असून, योजनांच्या अंमलबजावणीला गती मिळेल, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

येथील गर्ल्स हायस्कुल परिसरात महिला व बालविकास भवनाचे भूमीपूजन करताना त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद अध्यक्ष बबलूभाऊ  देशमुख अध्यक्षस्थानी होते. माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, विधानसभा सदस्य सुलभाताई खोडके, बळवंतराव वानखडे, महापौर चेतन गावंडे, जि. प. उपाध्यक्ष विठ्ठलराव चव्हाण, सभापती पूजा आमले, बाळासाहेब हिंगणीकर, सुरेश निमकर, जयंतराव देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा आदी उपस्थित होते.

महिला व बालविकास उपायुक्त, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, राज्य महिला आयोग व महिला आर्थिक विकास महामंडळ आदी कार्यालये या भवनात एकाच छताखाली असतील. या भवनासाठी 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

महिला आयोगाचे कार्यालय विभागीय स्तरावर सुरू करण्यात आले. ते कार्यालय देखील या इमारतीत असेल. महिला व बालविकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा नियोजनात तीन टक्के तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक कामांना चालना देण्यात येत असल्याचे मंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.

नागरी भागातही कुपोषणाची समस्या आहे. अशा बालकांचा शोध घेऊन त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. लोकप्रतिनिधी व विविध स्तरातील मान्यवर, नागरिकांनीही कुपोषित मुलांच्या संगोपनासाठी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

महिला व बालविकास अधिकारी प्रशांत थोरात यांनी प्रास्ताविक केले.

00000

आदिवासी महिला बचत गटांच्या उत्पादनांना ‘मेळघाट हाट’चा प्लॅटफॉर्म – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

अमरावती, दि. 28 : मेळघाटातील आदिवासी महिला भगिनींच्या बचत गटांद्वारे उत्पादित वस्तूंच्या विक्री व विपणनासाठी ‘मेळघाट हाट’चा प्लॅटफॉर्म निर्माण करण्यात येत आहे. या वस्तूंचा ब्रँड विकसित होण्यासाठी अधिक संशोधन व परिपूर्ण नियोजन करावे. या उपक्रमातून मेळघाटातील भगिनींना कायमस्वरूपी रोजगार मिळावा. त्यासाठी ‘मेळघाट हाट’ची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करावी, असे निर्देश पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी येथे दिले.

पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आदिवासी महिला बचत गटाच्या उत्पादनांच्या विपणनासाठी ‘मेळघाट हाट’ प्रकल्प आकारास येत आहे. त्याअनुषंगाने नियोजित प्रकल्पाबाबत सादरीकरण व चर्चेसाठी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. माजी आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मिताली सेठी आदी उपस्थित होते. ‘माविम’चे जिल्हा समन्वयक सुनील सोसे यांनी प्रकल्पाचे सादरीकरण केले.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, मेळघाटात स्थानिक महिला भगिनींना रोजगार मिळवून देण्यासाठी बचत गटांचे जाळे निर्माण करण्यात आले. या भगिनींकडून अनेक उत्कृष्ट उत्पादने निर्माण होतात. त्यात विविधता आणणे, या नैसर्गिक उत्पादनांची वैशिष्ट्ये जगापुढे आणणे व विपणनाचे जाळे भक्कम करणे यासाठी ‘मेळघाट हाट’चा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल.

संशोधन करा, नव्या संकल्पना राबवा

पालकमंत्री श्रीमती ठाकूर पुढे म्हणाल्या की, मेळघाटचा ब्रँड जगभर पोहोचण्यासाठी विपणन पद्धतीचे अधिकाधिक संशोधन करून, अभिनव संकल्पना राबवल्या पाहिजेत.

मेळघाट महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन्ही राज्यात विभागला गेला आहे. मध्यप्रदेशातील उत्पादने, वैशिष्ट्ये, स्वरूप यांचाही विचार प्रकल्पात व्हावा. मेळघाटच्या पारंपरिक उत्पादनांचा समावेश करावा, असेही निर्देश त्यांनी दिले.

गटांच्या सदस्यांना आर्थिक बाबींचे प्रशिक्षण मिळवून देण्याची आवश्यकता आहे, असे श्रीमती सेठी यांनी सांगितले.

मेळघाटात आहेत २५ हजार महिला गट सदस्य

मेळघाटात ‘एमएसआरएलएम’ व ‘माविम’कडून २ हजार ३५९ महिला स्वयंसहायता गट असून, २५ हजारहुन महिला सदस्य सहभागी आहेत.

आधुनिक विक्री केंद्र

उपक्रमात अमरावती शहरात मध्यवर्ती ठिकाणी आधुनिक विक्री केंद्र, माल साठवणुकीसाठी गोदाम, वाहतूक व्यवस्था, हरिसाल, धारणी, सेमाडोह व चिखलदरा येथे उत्पादने व संकलन केंद्रे असतील.

मॉलचे संचालन संपूर्णत: महिलांद्वारे

मॉलचे संचालन संपूर्णतया महिलांद्वारे करण्यात येईल. विविध गृहोपयोगी, हस्तनिर्मित कला वस्तू, खाद्यपदार्थ, धान्य, सेंद्रिय ताजा भाजीपाला, फळे, वनौषधी आदी उपलब्ध असेल. ‘महिला बचत गट आपल्या दारी’ उपक्रमात घरपोच सेवेबरोबर ऑनलाईन विक्रीही होणार आहे.

याबाबत विक्री केंद्राच्या संकल्पचित्राचे सादरीकरणही करण्यात आले.

00000

शेतकरी व महिला गटांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा

बचत गटांच्या बळकटीकरणासाठी विविध उपक्रम – पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर

अमरावती, दि. २८ : दर्जेदार उत्पादन निर्मितीसह विपणन कौशल्य व तांत्रिक बाबींच्या प्रशिक्षणातून शेतकरी व महिला बचत गटांचे बळकटीकरण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत, असे  प्रतिपादन पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

कृषी विभाग, आत्मा व श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातर्फे कृषी संजीवनी मोहिमेत शेतकरी व महिला गटांच्या प्रतिनिधींची कार्यशाळा श्री शिवाजी कृषी महाविद्यालयात झाली, त्याचे उद्घाटन करताना त्या बोलत होत्या. माजी राज्यमंत्री तथा विधानपरिषद सदस्य प्रवीण पोटे पाटील, वि. प. स. किरण सरनाईक, माजी आमदार वीरेंद्र जगताप, जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड, कृषी  सहसंचालक शंकर तोटेवार,जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे, अनिल खर्चान, महाविद्यालयाचे प्राचार्य नंदकिशोर चिखले आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट), प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेत एक जिल्हा एक उत्पादन, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया असे अनेक योजना- उपक्रम गटांसाठी राबविण्यात येत आहेत. त्याचा लाभ शेतकरी व महिला गटांना मिळवून द्यावा. त्यासाठी योजनेची माहिती, तांत्रिक बाबी याबाबत वेळोवेळी प्रशिक्षण, प्रचार- प्रसार होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आवश्यक कार्यशाळा आदींचे आयोजन नियमित करावे. योजनेचा शेवटच्या माणसाला लाभ मिळवून देण्यासाठी सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले. श्री. पोटे पाटील, श्री.सरनाईक आदींनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.