
नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सर्व ठिकाणी ओबीसी उमेदवार देण्याची घोषणा भाजपने केली आहे. त्यापाठोपाठ काँग्रेसनेही मोठी घोषणा केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण मिळाले नाही तर काँग्रेसकडून ओबीसींच्या 30 टक्के उमेदवारांना निवडणुकीचे तिकीट देण्यात येईल, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नागपूरमध्ये नाना पटोले यांनी ही घोषणा केली. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळेल की नाही याबाबत संभ्रम आहे. आरक्षण मिळाले नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस ओबीसींना 27 टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे 30 टक्के जागा देणार, अशी घोषणा पटोले यांनी केली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींचा मुद्दा असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ताट वाजवणाऱ्यांनी आपला विचार केला नाही
काँग्रेसने देशात स्वातंत्र्य लढा उभारला. देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. पण देशात आज ओबीसी समाज हक्काची लढाई लढत आहे. आपण एकत्रित नसल्याने आपल्याला आपले अधिकार मिळत नाहीये. जे लोक एकटे राहतात, त्यांना कोणी मारू शकत नाही. एकटे राहणारे संपले, असे ते म्हणाले. शाळेत एससी विद्यार्थ्यांना गणवेश, पुस्तके मिळायचे. 1999 ला मी आमदार झालो. हा मुद्दा मी लावून धरला आणि ओबीसींच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळायला लागली. 2002 पासून ओबीसींच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू झाली. ताट वाजवणाऱ्यांनी कधीही आपला विचार केला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. नानाच्या भानगडीत पडण्यापेक्षा महागाई, बेरोजगारीवर लक्ष द्यावे. 28 ऑगस्टला काँग्रेसचा स्थापना दिवस आहे. त्या निमित्ताने सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांची सभा व्हावी, ही राज्यभरातील नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळे ही सभा होत आहे, असेही त्यांनी सांगितले.





