
पवनी /धाबे :-पहाटेच्या प्रहरी रस्त्याने आम्ही फिरत असताना दोन व्यक्ती आम्हाला विरुद्ध दिशेने येताना दिसले. एकाच्या खांद्यावर दफडी वाद्य लटकाविले होते. आम्हाला वाटलं की कुठल्या कार्यक्रमात ही मंडळी वाद्य घेऊन जात असेल किंवा कार्यक्रम उरकून येत असेल परंतु आमचा अंदाज सपशेल खोटा ठरला.त्यांना विचारणा केल्यावर आश्चर्य वाटलं आणि म्हणून त्यांचा लगेच आम्ही फोटो घेतला. ही मंडळी आपल्या शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांनपासून संरक्षण करण्यासाठी या दफडी वाद्याचा उपयोग करतात. कारण जंगल शेजारी शेतकऱ्यांची हे दफडी वाद्य मैत्रीण झाले आहे.
वन्यप्राण्यांनी शेतक-यांच्या पीकाची नासाडी केल्यावर शासन जरी नुकसान भरपाई देत असेल तरी स्वयंप्रकाशित होण्याच्या अनुषंगाने शेतकरी रात्रभर आपल्या शेतात जागून पिकाचे संरक्षण करतात.
जंगलाच्या शेजारी असणारे गांव आणि त्या गावक-यांच्या शेतजमीनीला हे वन्यप्राणी मोठं नुकसान करतात.
अर्जुनी /मोर तालुक्यातील पवनी /धाबे हे गांव नवेगावबांध जलाशय, तसेच नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्प याच्या कुशीत वसले असून या बरोबरच जांभळी, येलोडी, रामपुरी, येरंडी दर्रे, भसबोळन, झाशीनगर, कान्होली, कोहलगाव अशी अनेक गावे वसलेली आहेत.
येथील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांनपासून बचाव करण्यासाठी शेताच्या बांधावर भलंमोठं मचान बांधले जाते. तेथे दोघी मंडळी बसून काठ्या आणि कुऱ्हाड घेऊन रात्रभर शेत राखण करतात.मचानाच्या खाली रात्रभर विस्तव जळत असतो. रानडुकरे, अश्वल, बिबट्या,बंदर (वानर ) शेतात, आले की शेतकरी जोराजोराने हे वाद्य बडवितात त्यामुळे हे वन्यजीव घाबरून जाऊन पोबारा करतात. शेतकरी याबरोबरच आपल्या शेतात बॅटरी करेंट (यामुळं आवाज होतो, प्राण्याला हानी पोचत नाही ),रंगीत साड्यांचे कुंपण,टीन पिंप, आवाज करणारी नकली बंदूक इत्यादीचा वापर शेतकऱ्यांना करावा लागतो. वानर आणि रानडुकरे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान करतात, हे विशेष.
अश्या प्रकारे जंगल शेजारी शेतकऱ्यांना आपलं जीव मुठीत घेऊन पिकांचे संरक्षण कराव लागतं.महिला शेतकरी पण यासाठी सहकार्य करतात.
वन्यप्राण्यांनवर येथील शेतकरी तितकाच प्रेम ही करतो. हेही विशेष.
(पृथ्वीराज कोल्हटकर )





