अनिल देशमुखांना मोठा दिलासा:मनी लाँड्रिगप्रकरणी 11 महिन्यानंतर जामीन, उच्च न्यायालयाचा निर्णय

0
25

मुंबई,दि.04ः–  मनी लाँड्रिग प्रकरणात 11 महिन्यांपासून अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.

जामिनानंतरही सुटका नाही

ईडीने अनिल देशमुखांविरोधात मनी लाँड्रिगचा गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणीच आज उच्च न्यायालयाकडून अनिल देशमुखांना जामीन मिळाला. मात्र, अनिल देशमुख लगेच तुरुंगाबाहेर येणार नाही, असे त्यांच्या वकिलांनी सांगितले आहे. ईडीने या जामिनास विरोध केला आहे. जामिनाविरोधात शासनाच्या महाधिवक्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे न्यायालयात सांगितले आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने जामिनास 13 ऑक्टोबरपर्यत स्थगिती दिली आहे. त्यामुळे जामिन मिळाला असला तरी देशमुख लगेच तुरुंगाबाहेर येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.

वसुलीचे पुरावे नाही

जामिनाबाबत अनिल देशमुखांच्या वकिलांनी सांगितले की, अनिल देशमुखांच्या म्हणण्यानुसार हप्ता किंवा वसुली झाली असे ईडीच्या तपासात कुठेही दिसून येत नव्हते. याप्रकरणात माफीचा साक्षीदार झालेला सचिन वाझे याने वेगवेगळ्या तपास यंत्रणांकडे वेगवेगळे जबाब दिले आहेत. त्यामुळे त्याचा जबाब विश्वासार्ह्य नाही. अनिल देशमुखांच्या सांगण्यावरुन वसुली झाली, याचे कोणतेही सबळ पुरावे ईडी कोर्टात देऊ शकली नाही.

सत्याचा विजय झाला आहे – सुप्रिया सुळे

अनिल देशमुख यांना जामीन मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सत्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यासाठी आम्ही कित्येक महिन्यांपासून संघर्ष करत आहोत. या कालावधीच आमचे सहकारी, या नेत्यांचे कुटुंब हे कोणत्या दुखातून गेले हे आम्ही जवळून पाहिले आहे. त्यामुळे आज आम्हाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला, असे वाटत आहे. मी न्याय व्यवस्थेचे आभार मानते.

राष्ट्रवादी काँग्रेसला दिलासा

सुप्रिया सुळे म्हणाल्या, आजच्या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही मोठा दिलासा मिळाला आहे. नेते व पक्षाच्या प्रतिमेला धक्का लावण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते. मात्र, तसे काही नव्हते हे आज सिद्ध झाले. त्यामुळे आजचा कोर्टाचा निर्णय म्हणजे सत्याचा विजय आहे.