– भाजपा जिल्हा विस्तारीत बैठक
गोंदिया : नुकत्याच झालेल्या गुजरातच्या निवडणुकीत भाजपने भरघोष यश मिळविले. हे सर्व बुथ मजबूत असल्याने व 51 टक्के मते घेतल्याचे परिणाम आहे. जिल्ह्यातही जिल्हा परिषद, पंचायत समिती व आता झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने मोठा विजय प्राप्त केला आहे. या विजयाचे शिलेदार असलेल्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन आहे. भविष्यातील निवडणुकीत विजयासाठी प्रत्येक बुथवर पेजप्रमुख तयार करा व बुथ सशक्त व समर्थ करुन 51 टक्के मते मिळविण्याचा संकल्प घेण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांनी केले.
ते अर्जुनी मोर येथील साईश्रद्धा लॉनमध्ये 8 जानेवारी रोजी आयोजित भाजपच्या जिल्हा विस्तारीत बैठकीत अध्यक्षस्थानावरुन मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी प्रामुख्याने खा. सुनिल मेंढे, आ. विजय रहांगडाले, जिप अध्यक्ष पंकज रहांगडाले, माजीमंत्री राजकुमार बडोले, प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. हेमंत पटले, प्रदेश सचिव माजी आ. संजय पुराम, माजी आ.खोमेश रहांगडाले, माजी आ. रमेश कुथे, माजी जिप अध्यक्ष विजय शिवणकर, माजी नगराध्यक्ष अशोक इंगळे, भंडारा-गोंदिया संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर, जिप सभापती संजय टेंभरे, जिल्हा महामंत्री संघटन संजय कुळकर्णी, जिल्हा महामंत्री मदन पटले, सुभाष आकरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष भावना कदम, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष ओम कटरे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष जे. डी. जगणीत, अनुसूचित जनजाती मोर्चा जिल्हाध्यक्ष हनुवत वट्टी, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गजेंद्र फुंडे, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक कदम, सीता रहांगडाले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जयंत शुक्ला, शेषराव गिरीपुंजे, शिवनारायण पालीवाल, मनोज बोपचे, विजय कापगते आदी उपस्थित होते. पुढे बोलताना मानकर म्हणाले, पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्यांसाठी 200 पेक्षा जास्त कल्याणकारी योजना काढल्या. या सर्व योजना तळागळातील लोकांपर्यंत पोहचवा. मन की बात व परीक्षा पे चर्चा हे कार्यक्रम प्रत्येक बुथवर आयोजित करावे असे ते म्हणाले. खा. सुनिल मेंढे म्हणाले, जी 20 चे अध्यक्षपद भारत भुषवित असून ही देशासाठी गौरवाची बाब असून मोठी संधी आहे. ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’च्या माध्यमातून आपल्या विचारांच्या लोकांना सोबत घ्यावे. पंतप्रधान मोदीजी व पक्षाचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोचविण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी आ. विजय रहांगडाले म्हणाले, सभागृहात केलेल्या धानाला बोनसची मागणी पूर्ण झाली असून 15 हजार रुपये प्रति हेक्टर शेतकर्यांना मिळणार आहे. शेतकरी हिताच्या निर्णयाने व्यापार्यांचे नुकसान झाले असून व्यापार्यांना लाभ पोहचविणारे विरोधक आगपाखड करीत आहेत. बोनसची रक्कम शेतकर्यांच्या खात्यात थेट जाणार आहे. शेतकरी हिताचे निर्णय घेणार्या शासनाचे त्यांनी आभार मानले. पंकज रहांगडाले यांनी जिपच्या माध्यमातून गोदाम बांधकामाचे कार्य वेग धरत आहे तसेच या वर्षीपासून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी खेळ व सांस्कृतिक महोत्सव सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगीतले. हेमंत पटले यांनी प्रास्ताविकातुन नुकत्याच झालेल्या 348 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे विश्लेषणात्मक माहिती देत बुथ जिंकण्यासाठी मार्गदर्शन केले. राजकुमार बडोले यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या विषयावर मार्गदर्शन करत आपल्या देशात प्रांत, भाषा, वेशभुषा, संस्कृति, परंपरेत विविधता आहे. लोह पुरुष वल्लभभाई पटेल यांनी विविध संस्थानिकांना एकत्र आणून एक भारत श्रेष्ठ भारत घडविला तसेच आपण सुद्धा या माध्यमातुन शाळा-महाविद्यालय व संस्थांच्या माध्यमातून एकतेचे सुत्र निर्माण करण्यास सांगीतले. विरेंद्र अंजणकर यांनी सोशल मिडीयावर मार्गदर्शन करताना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षाचे ध्येय, धोरण, कार्यक्रम, शासनाच्या योजना, निर्णयांचा सामाजिक माध्यमातुन प्रचार, प्रसार करावा तसेच विरोधकांना उत्तर द्यावे, असे सांगीतले. संजय टेंभरे यांनी पंचायत राज व ग्रामविकास कमिटीबद्दल मार्गदर्शन केले. जयंत शुक्ला यांनी जी 20 बद्दल विस्तृत माहिती दिली. प्रसंगी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री दिवंगत हिराबेन, सदाशिव अंजनकर आणि पत्रकार रमणकुमार मेठी यांना श्रद्धांजली देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद स्विकृत सदस्यपदी निवड झालेल्या रामदास कोहाडकर व हरिहर मानकर यांचे सत्कार करण्यात आले. याप्रसंगी सुभाष निनावे, मंजुषा तरोणे, बाबूल बनिक आदींनी पक्षात प्रवेश केला. त्यांचा पक्षातर्फे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर यांनी केले. आभार जिल्हा महामंत्री मदन पटले यांनी मानले.





