नदीपात्रात आढळले मानवी सांगाडे

0
19

चंद्रपूर : गडचिरोली व चंद्रपूर या दोन जिल्ह्यांच्या मधून वाहणाऱ्या जिल्ह्यातील सर्वात मोठ्या वैनगंगा नदी पात्रात मृतदेह दफन विधी तथा अंत्यसंस्कार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नदी पात्रतील पाणी ओसरल्याने मृतदेहाचे सांगाडे दिसू लागले आहेत. हा प्रकार जिल्हातील सावली तालुक्यात घडला आहे. विशेष म्हणजे या नदीतून शेकडो गावांना पाणी पुरवठा केला जातो.

दफनविधीसाठी आरक्षित केलेल्या जागेमध्ये मृतदेहाचे दफन न करता चक्क नदीपात्रामधील रेतीत मृतदेह दफन करीत असल्याचा धक्कादायक प्रकार उघळकीस आला आहे. चंद्रपूर व गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या सीमेच्या मध्यभागातून वैनगंगा नदी वाहते आहे. पावसाळ्यात ही नदी दोन्ही बाजूला तुडुंब भरून असते. त्यामुळे या नदीचे पात्र दिसत नाही. मात्र उन्हाळ्यात नदी पात्र कोरडे पडलेले असते. दोन्ही बाजूला नदी पात्रात रेती दिसून येते. या नदीच्या पूर्व दिशेच्या काठावर गडचिरोली जिल्ह्याचा गडचिरोली तालुका, तर नदीच्या पश्चिम दिशेच्या काठावर चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुका व्याहाड गाव आहे. सध्या उन्हाळा असल्यामुळे वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. या नदीच्या पत्रातून दोन्ही जिल्ह्यातील शेकडो गावांना पाणी पुरवठा होतो. विविध गावांना जलजीवन, जलमिशन, सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून इथून पाणीपुरवठा केला जातो. याच भागात गडचिरोली तालुक्याच्या टोकावरील गावातील नागरिक हे मृतदेहाचे अंत्यसंस्कार विधी करताना नदीच्या काठावर आरक्षित केलेल्या जागेवर न करता चक्क नदीपात्रातील रेतीत अडीच फुटाचा खड्ड्या करून त्यात मृतदेहाचे दफन करीत आहेत.नदीचे पात्र कोरडे पडताच काही मृतदेहांचे सांगाडे आता जमिनीवर दिसू लागले आहेत. व्याहड गावातील मृतदेह अंतिम संस्कार तथा दफनविधी अशाच प्रकारचे होत असल्याचं सांगण्यात येत आहे. विधी पार पाडण्याकरिता शासनाच्या वतीने स्मशानभूमीची जागा आरक्षित करून दिली आहे. या आरक्षित जागेवर काही समाजाकडून परंपरेनुसार मृतदेहाचे दहन अथवा दफन केले जाते. वैनगंगा नदीपात्रातील रेतीमध्ये मृतदेह दफन तर काही ठिकाणी दहन केले जात आहे. या प्रकारणे नदी पात्र प्रदूषित झाले आहे.