गोंदिया : लोकसभेत राहुल गांधीनी लोकसभा अध्यक्ष यांच्याकडे पाहून फलाइंग किस दिली. बुधवारी राहुल गांधीनी जो धमाका आपल्या भाषमाद्वारे संसदेत केला त्याला यांना उत्तर देता येत नाही म्हणून आता अशा महिलांना पुढे करून त्यांना बदनाम करण्याचा घाट रचला जात आहे. भाजपच्याच खासदार हेमामालिनी यांनी सुद्धा म्हटले आहे की मी राहुल गांधी यांना असे काही करतांना संसदेत बघितले नाही. आता कुणावर विश्वास ठेवावा? असा आरोप महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी गोंदिया शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रपरिषदेत केला.
भाजप म्हणजेच अखिल भारतीय खोटारडी पार्टी आहे. कलावती बांदूरकर प्रकरणी त्यांना भाजपच्या सरकारने मदत केली असल्याची खोटी माहिती ते देतात. यवतमाळ जिल्ह्यातील या महिलेला माध्यमांनी विचारणा केली असता या महिलेने राहुल गांधी यांनी घरी येवून सांत्वन केल्यानंतरच त्यांना शासकिय मदतीसह इतर सुविधा मिळाल्याचे सांगीतल्यावरून कळते की केंद्रीय गृहमंत्र्यांनी लोकसभेत खोटी माहिती दिल्याचाही त्यांनी आरोप केला.
या प्रसंगी आमदार सहेसराम कोरेटी, माजी आमदार दिलीप बनसोड,प्रदेश सचिव पी.जी.कटरे,अमर वराडे,नामदेवराव किरसान,ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष जितेंंद्र कटरे,किसान आघाडी अध्यक्ष जितेश राणे,महिला जिल्हाध्यक्ष वंदना काळे,माजी नप.उपाध्यक्ष अशोक गुप्ता आदी उपस्थित होते. वडेट्टीवार म्हणाले की भाजपच्या लोकांना खोटं बोलण्याशिवाय काहीच येत नाही. आणि दुस-यांच्या कर्तबगारीवर आपली पाठ थोपटून घेणे हाच भाजपचा धंदा आहे. यांचे दिवस आता भरलेले आहेत. कलावतींसह दिल्लीतील निर्भयाच्या भावाला पायलट करण्याचं काम राहुल गांधीनी केलं. यांचा गेल्या ९ वर्षात उल्लेखनीय अशा कोणताही काम नाही, विकास नाही. लोकसभेतील विश्वासदर्शक ठरावा संदर्भात बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की मणिपूर जळत असल्यापासून ‘मौनीबाबांनी’ मौन पाळले होते. त्यांचे मौन उघडावे म्हणून आणलेला हा विश्वासदर्शक ठराव आहे. आमच्याकडे आकडेवारी नाही, मात्र, ‘मौनीबाबांनी’ या प्रकरणी आपले तोंड उघडले पाहिजे. मणिपुर पेटविण्याचा काम कुणी केलं? या मागे केंद्रातील मोदी सरकार आणि मणिपुर राज्यातील विरनसिंग यांची भाजपची सरकार जवाबदार असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
ओबीसी हिताच्या योजना काँग्रेसच्या सरकारमध्येच आल्या असून भाजप ओबीसी युवकांचा वापर फक्त मत व मंदिरातील घंटा वाजविण्यासाठीच करीत असल्याचे सांगत पहिल्यांदा महाराष्ट्रात विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना ओबीसींना शिष्यवृत्ती लागू झाली.आमच्या काळात वसतीगृह मंजूर झाले परंतु हे सरकार ते सुरु करण्यास टाळाटाळ करीत आहे.महाज्योतीला आम्ही सुरु करुन हजारो विद्यार्थ्यांना न्याय दिल्याचेही वड्डेटीवार म्हणाले.