
गोंदिया, दि.19 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ग्रामीण भागात 70 हजार 328 ऑफलाईन आणि 72 हजार 387 ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी संजय गणवीर यांनी दिली, तर शहरी भागात 15 हजार 744 अर्ज प्राप्त झालेले आहेत. असे आतापर्यंत एकूण 1 लाख 58 हजार 459 महिलांनी अर्ज भरले आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
ग्रामीण व शहरी भागात अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र केंद्र स्थापन केले आहे. आवश्यक कागदपत्रांविषयी महिलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असलेल्या पात्र महिलांकडून अर्ज भरून घेतले जाणार आहेत. मात्र, पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट मिळणार आहे. त्यानंतर पात्र महिलांच्या बँक खात्यावर जुलैपासून दरमहा दीड हजार लाभ जमा होणार आहे. या योजनेचा अर्ज ‘नारी शक्ती दूत’ या ॲपवरूनही भरता येणार आहे. अंगणवाडी तसेच सेतू केंद्र तसेच तहसिल कार्यालयात येणाऱ्या महिलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया 31 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरुच राहणार आहे.
महाराष्ट्र शासनाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली आहे. या महत्वाकांक्षी योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक स्वावलंबन देणे, त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करणे आणि त्यांच्या कुटूंबातील निर्णय प्रक्रियेत त्यांची भूमिका मजबूत करणे आहे.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र महिलांना जुलै महिन्यापासून दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत मिळेल. हे पैसे महिलांना त्यांच्या वैयक्तिक आणि घरगुती खर्च चालविण्यासाठी तसेच त्यांच्या आरोग्य व पोषणासाठी आणि कुटूंबाच्या निर्णयांमध्ये अधिक सक्रियतेने योगदान देण्यासाठी आर्थिक आधार प्रदान करतील.
योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि जास्तीत जास्त महिलांना योजनेत सहभागी करुन घेण्यासाठी शासनाचे प्रयत्न असून योजनेत अडचणीच्या ठरणाऱ्या अनेक अटींमध्ये शिथिलता देण्यात आली आहे.
जास्तीत जास्त महिलांनी नोंदणी करावी – जिल्हाधिकारी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची महत्वाकांक्षी योजना असून या योजनेत पात्र महिलांना आर्थिक लाभ मिळणार आहे. योजनेत अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे. या योजनेत जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.