
गोंदिया,दि.२४ः जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथीला वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांची उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या चंद्रिकापुरे पितापुत्रांनी आज (दि.२४)आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करीत तिसऱ्या आघाडीत प्रवेश केला आहे.
चंद्रिकापुरे यांनी तिसऱ्या आघाडीत प्रवेश करून त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाची दिशा ठरवली आहे.अजित पवार व प्रफुल पटेल यांनी तिकीट नाकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली होती.त्यावर तोडगा काढत त्यांनी तिसऱ्या आघाडीत प्रवेश करून आपल्या समर्थकांना नवीन पर्याय दिला आहे. या प्रवेशामुळे आगामी निवडणुकीत मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी चंद्रिकापुरे यांचे स्वागत करत त्यांचा अनुभव पक्षासाठी फायदेशीर ठरेल, असे मत व्यक्त केले. चंद्रिकापुरे यांचा हा निर्णय पक्षाच्या स्थानिक आणि राज्य पातळीवरील राजकारणावर मोठा प्रभाव पाडणार असल्याचे मानले जात आहे.विधानसभा निवडणुकीतील या नव्या घडामोडीमुळे अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले आहे.