
नवीन सरकारकडून अपेक्षा
अर्जुनी मोर.-विदर्भातील तसेच राज्यातील गोरगरीब जनता, शेतकरी, शेतमजुरांसाठी चांगल्या उपाययोजना कराव्यात व त्यांना सक्षम करावे. एवढी माफक अपेक्षा, नवनियुक्त शासनाकडून सुप्रसिद्ध कीर्तनकार व समाजप्रबोधक सत्यपाल महाराजांनी व्यक्त केली आहे.
नवीन शासनाने गोरगरीब ,मायबाप शेतकऱ्यांसाठी काम करावे,तसेच संतांचे विचार जे आजही प्रेरणादायी आहेत.ज्यांनी अनादी काळापासून पेरलेले आहेत,त्या विचाराचा वारसा शासनाने पुढे न्यावा. असेही सत्यपाल महाराज पुढे म्हणाले.
रात्री (दि.२४) अर्जुनी मोरगाव तालुक्यातील प्रतापगड येथील किर्तन आटोपून नवेगावबांध येथे रात्री मुक्कामास असलेले सत्यपाल महाराज यांच्याशी आज (दि.२५.) नवेगावबांध येथे बातचीत करताना ते बोलत होते.
सत्यपाल महाराज यांना नवीन सरकारकडून काय अपेक्षा असेल? असे विचारण्यात आले त्यावेळी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
हल्लीच्या जातीय-धार्मिक द्वेषावर बोलताना महाराज पुढे म्हणाले ,आजही वारकरी संप्रदायामध्ये मुसलमानही आहेत, ते पायी वारी करतात, भजन- कीर्तन करतात.त्यामुळे समाजामध्ये दुरावा निर्माण करण्यापेक्षा एकोपा ठेवावे. सर्व जाती धर्माच्या लोकांना कसे एकत्र राहता येईल,आपसात कसं जुळवून घेता येईल.यातच कशी भलाई आहे, हे सर्वांनी ध्यानात ठेवले पाहिजे. एखादी घटना घडली तर तिच्या मुळापर्यंत जाऊन सत्य शोधले पाहिजे. समाजात असत्य व अफवा पसरवून तर तो जे घडलेले नसेल तेही घडलेलं आहे, असं ते पेरून त्यावर आक्रमक होणे ही फारच चुकीची पद्धत आहे, म्हणून एकत्र राहून मिळून-मिसळून राहूनच देशाचे कल्याण आहे.
असे ते पुढे म्हणाले,महाराष्ट्राच्या भौगोलिक परिस्थितीवर महाराजांना विचारले असता,आपण संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे. आपल्या अनुभवावरून सांगितलं की, आपल्या विदर्भापेक्षा पश्चिम महाराष्ट्राकडे जास्त जमीन आहे. तिकडे श्रीमंती जास्त आहे. तिकडची लोक शेतीला जोडधंदे करतात.पुण्या-मुंबई सारखे मोठी बाजारपेठ आहे. म्हणून ते समृद्ध आहेत.
त्या तुलनेत विदर्भातील शेतकरी मात्र फारच गरीब आहे.इतर महाराष्ट्राच्या तुलनेत फुले-शाहू-आंबेडकर-गाडगे महाराजांच्या विचारांमुळे विदर्भातील लोक अंधश्रद्धाळू नाहीत.ही एक जमेची बाब आहे.
आजच्या तरुण पिढी कडून काय अपेक्षा आहे?
आजची तरुण पिढी ही वरवर जे काही दिसते शान शौकत याच्या आहारी गेलेली आहे.वाचन संस्कृती संपलेली असल्यामुळे पोरं आवश्यक काम सोडून किंवा शिक्षण सोडून मोबाईल पाण्यात जास्त वेळ घालवतात त्यामुळे इतर कामासाठी त्यांना वेळेचे भान राहत नाही.आता कुठलेही पारंपारिक काम शिल्लक नसल्यामुळे त्यांच्यापुढे व्यसनाधीन झालेल्या या तरुणाईला पैशाची गरज असते. पैशासाठी वाटेल ते आजची तरुण पिढी करत आहे.हे योग्य नाही. एका तरुण मुलाने आपल्या आईला ब्याट डोक्यात घालून आईचा जीव घेतला हे आपण वर्तमानपत्रातून वाचले.
अशा प्रकारच्या घटना हृदय विदारक आहेत.
कुठल्याही प्रकारची विचारशक्ती व परिणामाची चिंता नसलेली ही तरुण पिढीची वाटचाल योग्य नाही ती त्यांनी बदलावी. आजच्या आई- वडिलांना तरुण पिढीला सावरण्याचं मोठं आव्हान आहे, असेही ते पुढे बोलले.संत वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष किशोर तरोणे याचे कडून संत तुकाराम गाथा व तुकाराम महाराजांची फोटो सत्यपाल महाराजांना भेट दिली. यावेळेस लोकपाल गहाणे,रामदास बोरकर, खुणे गुरुजी, चुन्नीलाल येरणे,दिलीप पोवळे, कालीदास पुस्तोडे, आशिष जयस्वाल, भाष्कर बाळबुद्धे उपस्थित होते.




