वर्धा,दि.१४ : वर्धेलगत असलेल्या सिंदी मेघे येथील रहिवासी समीर चुटे, शुभम मेश्राम, सुशील मस्के व धनराज धाबर्डे हे चौघे मित्र गुरुवारी धनराजचा वाढदिवस असल्याने निघाले होते.विशितील हे तिघेही रात्रीच कारने सेलूकडे निघाले.रात्री धनराजचा वाढदिवस आटोपून परत येत असताना झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची गुरुवारच्या रात्रीला घटना घडली.
चौघेही वर्धेकडे परत येत असताना समोरून एक ट्रक येत होता. त्यास वळसा घालण्याच्या प्रयत्नात भरधाव वेगातील कार उलटली. त्यात घटनास्थळीच दोघांचा मृत्यू झाला. एकास नागपुरात उपचारासाठी नेत असताना मृत्यू ओढवला. चौथा मित्र धनराज धाबर्डे हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.आज पहाटे ही घटना उजेडात आली. अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चौकशी करीत मृतदेह ताब्यात घेतले. या मृतदेहावर वर्धेच्या सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या भीषण अपघाताने सिंदी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सायंकाळी सिंदी स्मशानभूमीत या तिघांवर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. शेकडो नागरिक यावेळी उपस्थित होते.
अपघाताची अन्य एक घटना शहरात घडली. येथील देहाणकर लेआऊट परिसरात श्रीधर गिरी ५७, हे जलसंपदा विभागात कार्यरत अधिकारी राहतात. ते सायंकाळी विकास भवन परिसर रस्त्याने जात असताना एका वाहनाने त्यांना मागून धडक दिली. त्यात गिरी यांच्या डोक्याला, गळ्याला मार बसला. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.